सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न आणि श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !

‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा फर्मागुडी (गोवा) येथील मैदानात पार पडला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने या सोहळ्याचे वैज्ञानिक संशोधन करण्यात आले. या संशोधनाविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. मधुरा कर्वे यांच्या मनात निर्माण झालेले काही प्रश्न आणि देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे मी दिलेली त्यांची उत्तरे पुढे दिली आहेत.  

(भाग ३)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/843755.html

‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्यातील एक क्षण

प्रश्न क्र. ७

ब्रह्मोत्सवापूर्वी गायन, वादन आणि नृत्य सादर करणारे साधक अन् कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा साधक यांच्यामध्ये २५० मीटरपेक्षाही अधिक नकारात्मक ऊर्जा आढळून आली. यांमागील कारण काय ?

सौ. मधुरा कर्वे

७ अ. उत्तर

७ अ १. ब्रह्मोत्सवात गायन, वादन आणि नृत्य सादर करणारे साधक : वाईट शक्तींचा गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे साधना करणार्‍या साधकांना विरोध नव्हता, तर त्यांच्या माध्यमातून सात्त्विक अशा भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार होण्यासाठी विरोध होता. सध्या रज-तमप्रधान गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे वाईट शक्तींचे कार्य प्रभावीपणे चालू आहे. पृथ्वीवर शास्त्रीय आणि सात्त्विक स्वरूप असलेले संगीत अंशतः शिल्लक आहे. सात्त्विक संगीताला संजीवनी देण्याचे कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले हे करत आहेत. या कार्याला विरोध करण्यासाठी ब्रह्मोत्सवात वाईट शक्तींनी गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे स्वतःची कला ब्रह्मोत्सवात सादर करणार्‍या साधकांवर सूक्ष्मातून आक्रमणे केली; परिणामी त्या साधकांमध्ये ब्रह्मोत्सवापूर्वी पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून आली.

श्री. राम होनप

७ अ २. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा साधक : ब्रह्मोत्सवात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा साधक परात्पर गुरु डॉक्टरांचे कार्य आणि माहात्म्य यांचे वर्णन करतो. हे वाईट शक्तींच्या मनाविरुद्ध असते. त्यामुळे त्यांना राग अनावर होतो. त्या रागातून वाईट शक्ती परात्पर गुरु डॉक्टरांवर सूक्ष्मातून आक्रमणे करतात; परंतु त्याचा काही उपयोग होत नाही; कारण परात्पर गुरु डॉक्टरांचे कार्य अवतारी आहे. याचा रोष वाईट शक्तींनी ब्रह्मोत्सवापूर्वी सूत्रसंचालन करणार्‍या साधकावर व्यक्त केला. याचा परिणाम म्हणून त्या साधकावर ब्रह्मोत्सवापूर्वी पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून आली.

प्रश्न क्र. ८

ब्रह्मोत्सवात गायन आणि नृत्य सादर करणार्‍या काही साधिकांमध्ये कार्यक्रमानंतर २३ मीटर ते ६१ मीटर सकारात्मक ऊर्जा आढळून आली. याउलट गायन आणि नृत्य करणार्‍या काही साधिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात आढळून आली. यांमागील कारण काय ?

८ अ. उत्तर

८ अ १. ब्रह्मोत्सवानंतर गायन आणि नृत्य करणार्‍या काही साधिकांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून येण्यामागील कारणे

अ. ब्रह्मोत्सवात कला सादर करतांना या साधिकांचा गुरूंप्रती भोळा आणि उत्कट भाव होता.

आ. ब्रह्मोत्सवात या साधिकांनी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रत्यक्ष श्रीकृष्णस्वरूपात अनुभवण्याचा प्रयत्न केला.

साधिकांची ही आंतरिक स्थिती ब्रह्मोत्सवानंतरही टिकून होती; परिणामी त्यांना ब्रह्मोत्सवातून पुष्कळ दैवी ऊर्जा ग्रहण करता आली.

८ अ २. ब्रह्मोत्सवानंतर गायन आणि नृत्य करणार्‍या काही साधिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा अल्प आढळून येण्यामागील कारणे : ब्रह्मोत्सवात गायन आणि नृत्य करणार्‍या काही साधिकांनी गुरूंना त्यांची कला भावपूर्ण समर्पित केली होती. तेव्हा त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती; परंतु ब्रह्मोत्सवानंतर ‘मी पूर्ण क्षमतेने चांगली कला सादर केली’, या विचाराने काही साधिकांचे मन सुखावले. काही साधिकांच्या मनात ‘कार्यक्रमाला उपस्थित असलेले साधक आता माझे कौतुक करतील’, असा अहंयुक्त विचार आला, तसेच ‘कला सादर करतांना माझे कुठे चुकले तर नाही ना ?’, याचा काही साधिकांच्या मनावर ताण आला. त्यामुळे साधिकांची भावाची स्थिती न्यून झाली; परिणामी ब्रह्मोत्सवानंतर त्या साधिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा अल्प दिसून आली.

प्रश्न क्र. ९

ब्रह्मोत्सवानंतर ब्रह्मोत्सवात विविध सेवा करणार्‍या अन्य साधकांच्या तुलनेत दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाच्या साधकांमध्ये सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अल्प आहे. यामागील कारण काय ?

९ अ. उत्तर

९ अ १. दुसर्‍या क्रमांकाच्या साधकामध्ये ब्रह्मोत्सवानंतर सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अल्प असण्यामागील कारण : या साधकाच्या मनावर ‘सेवेत माझ्याकडून काही चुका झाल्या नाही ना ?’, याविषयीचा ताण पुष्कळ होता, तसेच लौकिक विचारांचे प्रमाणही अधिक होते; परिणामी ब्रह्मोत्सवानंतर त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अल्प होते.

९ अ २. तिसर्‍या क्रमांकाच्या साधकामध्ये ब्रह्मोत्सवानंतर सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अल्प असण्यामागील कारण : या साधकाने ब्रह्मोत्सवात परात्पर गुरु डॉक्टरांसाठी लागणार्‍या रथाच्या निर्मितीची सेवा यथाशक्ती आणि भावपूर्ण केली. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘रथाची रचना अध्यात्मशास्त्रानुसार असावी’, यासाठी वेळोवेळी साधकांना मार्गदर्शन केले. त्यामुळे रथात पुष्कळ विष्णुतत्त्व आकृष्ट झाले. हा दैवी रथ साकार करण्यात या साधकाने मनोभावे सहभाग घेतला होता. वाईट शक्तींना त्याचा राग आला होता. त्यामुळे वाईट शक्तींनी सूक्ष्मातून तीव्र स्वरूपात त्या साधकावर आक्रमणे केली; परिणामी त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत घट झाली.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.८.२०२३)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.