सद़्‍गुरूंचे महत्त्व !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

जगद़्‍गुरु संत तुकारामांनी आपल्‍या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे, ‘नामस्‍मरणासारखे सोपे साधन नाही.’ तुमचा सध्‍याच्‍या साधूंवर विश्‍वास नसला, तरी समर्थ रामदासस्‍वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी सांगितले, त्‍यावर तरी विश्‍वास ठेवायला काय हरकत आहे ? त्‍यांनी तुमच्‍या कल्‍याणाकरताच ते साधन सांगितले आहे. ‘संसारात सुख नाही’, असे आपल्‍याला दिसत असतांना ज्‍या योगाने सुख मिळेल, त्‍याच्‍या खटपटीला लागले पाहिजे. त्‍याकरता होईल तितके नामात रहाण्‍याचा प्रयत्न करा, म्‍हणजे तुम्‍हाला खरे समाधान मिळेल. प्रत्‍येक माणसाने आपल्‍या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्‍या जीविताचे सार आहे. अनन्‍यतेखेरीज भगवंताची प्राप्‍ती नाही; त्‍यातच भक्‍ती जन्‍म पावते.

– ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज