Mizoram Hari Mandir In Danger : ख्रिस्‍ती बहुसंख्‍य मिझोराममध्‍ये हरि मंदिराच्‍या सरकारीकरणाचे भय !

  • मंदिर भारतीय सैन्‍याच्‍या ‘आसाम रायफल्‍स’कडून राज्‍य सरकारच्‍या अखत्‍यारीत जाण्‍याची शक्‍यता !

  • मिझोराम गोरखा मंदिर सुकाणू समितीने ‘आसाम रायफल्‍स’ला लिहिले पत्र !

मिझोराममधील हरि मंदिर

आयझॉल (मिझोराम) – पूर्वोत्तर भारतातील ख्रिस्‍तीबहुल राज्‍य असलेल्‍या मिझोराममध्‍ये तेथील हिंदूंचे एक ऐतिहासिक मंदिर सरकारच्‍या कह्यात जाण्‍याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. राजधानी आयझॉल येथे असलेल्‍या ‘आसाम रायफल्‍स हरि मंदिरा’चा (महादेव त्राण मंदिराचा) कारभार आतापर्यंत आसाम रायफल्‍सकडून चालवला जात असे; परंतु आता आसाम रायफल्‍सचे केंद्र शहरापासून १५ किमी दूर झोखावसांग या क्षेत्रात हालवण्‍याचा निर्णय झाल्‍याने या मंदिराचे व्‍यवस्‍थापन राज्‍य सरकारकडे जाईल, अशी भीती व्‍यक्‍त केली जात आहे. हे मंदिर गोरखा आणि ब्रू रेआंग या हिंदु समुदायांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे.

१. या मंदिरात जन्‍माष्‍टमी, दुर्गापूजा, दिवाळी यांसारखे सण साजरे करण्‍यासमवेत विवाह आणि कीर्तन यांसारख्‍या कार्यक्रमांचेही हे मंदिर केंद्र आहे.

२. मिझोराम गोरखा मंदिर संचालन समितीचे अध्‍यक्ष मनकुमार जैशी यांनी नुकतेच हरि मंदिराच्‍या भवितव्‍याविषयी चिंता व्‍यक्‍त करणारे पत्र आयझॉल-आधारित ‘२रे आसाम रायफल्‍स’च्‍या कमांडंटला लिहिले.

३. जैशी यांनी लिहिले की, आसाम रायफल्‍सच्‍या सुरक्षा कर्मचार्‍यांच्‍या कुटुबियांसाठी हरि मंदिराचे पुष्‍कळ भावनिक महत्त्व आहे. हे मंदिर जपले जावे आणि आसाम रायफल्‍सच्‍या सैनिकांच्‍या वंशजांनी तसेच अन्‍य हिंदु समाजाने त्‍यात पूजा करावी, असे आमचे नम्र आवाहन आहे.

४. जैशी म्‍हणाले की, जुलै २०२४ मध्‍ये आसाम रायफल्‍सचे स्‍थलांतर करण्‍यासाठी केंद्र सरकार आणि मिझोराम सरकार यांच्‍यात सामंजस्‍य करार झाला होता. कराराची सद्य:स्‍थिती निश्‍चित ठाऊक नसली, तरी मिझोरम सरकार ‘आसाम रायफल्‍स संकुल’ ताब्‍यात घेणार, हे स्‍पष्‍ट आहे.

५. हे ऐतिहासिक हरि मंदिर आसाम रायफल्‍सच्‍या आवारात असल्‍याने मंदिर चालवण्‍याचे, व्‍यवस्‍थापनाचे आणि देखभालीचे दायित्‍वही मिझोराम सरकारच्‍या हातात जाईल, अशी भीती स्‍थानिक हिंदूंना वाटते.

६. आम्‍ही विनंती करतो की, मंदिराचे व्‍यवस्‍थापन गोरखा हिंदूंना सोपवण्‍यात यावे.

मिझोराममध्‍ये हिंदूंचा छळ !

वर्ष २००१ च्‍या जनगणनेच्‍या आकडेवारीनुसार मिझोराममधील ख्रिस्‍त्‍यांची लोकसंख्‍या ७.७ लाख इतकी आहे. त्‍या तुलनेत राज्‍यात केवळ ३१ सहस्र ५६२ हिंदू आहेत. राज्‍यातील हिंदूंमध्‍ये प्रामुख्‍याने गोरखा आणि ब्रू रेहांग यांचा समावेश होतो. ब्रू रेहांग यांना वर्ष १९९७ मध्‍ये मिझो लोकांच्‍या अत्‍याचारांना सामोरे जावे लागले होते. या कारणामुळे ब्रू रेहांग समुदायाचे लोक त्रिपुराला पळून गेले होते. वर्ष २०१८ मध्‍ये त्रिपुरा आणि मिझोराम यांच्‍यात झालेल्‍या करारानंतरच ब्रू लोकसंख्‍या येथे परतू शकली.

मिझोराममध्‍येही मंदिरांवर आक्रमणे झाल्‍याची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

राज्‍यात हिंदु प्रथांविरुद्ध नेहमीच वैराची भावना राहिली आहे. कोणताही प्रमुख नेता हिंदूंशी संबंधित असल्‍याचे दिसल्‍यास त्‍याची अपकीर्ती केली जाते. वर्ष २०११ मध्‍ये ‘मिझो नॅशनल फ्रंट’ने कोलकाता येथे दुर्गापूजा आणि विजयादशमी या हिंदु सणांना उपस्‍थित राहिल्‍यावरून तत्‍कालीन मुख्‍यमंत्री लाल थनहवला यांच्‍यावर आक्रमण केले होते.

संपादकीय भूमिका

एखाद्या राज्‍यात हिंदू बहुसंख्‍य असोत कि अल्‍पसंख्‍य, बुहतांश हिंदूंमध्‍ये धर्माप्रती असलेल्‍या अनास्‍थेमुळे त्‍यांच्‍या मंदिरांचे सरकारीकरण होते. आता मिझोराममध्‍येही असे झाले, तर आश्‍चर्य वाटू नये !