साधकातील भाव कसे कार्य करतो !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मर्दन करण्याची सेवा करून आलेल्या साधकात भाव न्यून असल्याने त्याच्या मनाची स्थिती चांगली नसणे; मात्र त्या साधकाकडे पहाणार्‍या अन्य साधकाचा भाव चांगला असल्याने त्या साधकाला संतांतील चैतन्याचा अधिक लाभ होणे : ‘पूर्वी एक साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मर्दन करण्याची सेवा करायचा. एकदा त्याला होणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे त्याच्या मनाची स्थिती चांगली नव्हती. परात्पर गुरु डॉक्टरांना मर्दन करून झाल्यावर तो सहसाधकांशी नेहमीप्रमाणे सेवेच्या काही विषयांवर बोलत होता. संतसेवा करणार्‍या साधकाला पाहून एका साधकाला मनोमन पुष्कळ आनंद झाला आणि त्याची भावजागृती होऊ लागली. तेव्हा त्या साधकाचा भाव होता, ‘संतांचा प्रत्यक्ष सत्संग लाभलेल्या, त्यांची स्थुलातून सेवा करणार्‍या साधकाचा सहवास मला लाभत आहे’, हे माझे भाग्यच आहे.’ त्यामुळे त्या साधकाची संतांची सेवा करणार्‍या साधकाच्या चरणीही कृतज्ञता व्यक्त होत होती. संतसेवा करणार्‍या साधकाच्या मनाची स्थिती मात्र आतून चांगली नव्हती. तो प्रत्यक्ष संतसेवा करूनही भावाच्या अभावामुळे कोरडाच राहिला होता.

संतसेवा करणार्‍या साधकाची स्थिती चांगली नसली, तरी त्याच्याकडे पहाणार्‍या साधकाचा भाव मात्र चांगला असल्याने प्रत्यक्ष संतसेवा करणार्‍या साधकापेक्षा दुसर्‍या साधकाला संतांच्या चैतन्याचा अधिक लाभ झाला.

२. साधकाने भावजागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ‘सर्वत्र देवाला कसे पहायचे ?’, हे त्याला शिकायला मिळून साधनेत प्रगती करून घेता येणे : ‘भाव तेथे देव’, असे का म्हणतात ?’, हे यातून लक्षात येते. भावसत्संगात जे भावप्रयोग सांगितले जातात, भावजागृतीसाठी आपण जे प्रयत्न करतो, ते साधकाला केवळ आनंद आणि उत्साह देण्यापुरते नसून त्याच्या इतरांकडे पहाण्याच्या दृष्टीमध्येही योग्य पालट घडवून आणतात. त्यामुळे साधक ‘सर्वत्र देवाला कसे पहायचे’, हे शिकतो आणि प्रगती करून घेतो.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ