पिंपरी-चिंचवड येथील शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा !

दोषींवर कडक कारवाई करण्याची पालकांची मागणी !

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – शाहूनगर येथील डी.वाय. पाटील शाळेत ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या गंभीर घटनेनंतर शाळा प्रशासनाने पालकांची क्षमा मागितली असून दिलगिरी व्यक्त केली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अल्पाहार म्हणून ब्रेड आणि चटणी देण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळल्यासारखे झाल्याने काही विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. इतर विद्यार्थ्यांना पालकांसोबत घरी पाठवण्यात आले. शाळा प्रशासनाविषयी खेद व्यक्त करत या वेळी शाळेने हलगर्जीपणा केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न खाऊ घालणार्‍या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

या घटनेविषयी डी.वाय. पाटील शाळेचे संचालक अभय कोतकर यांनी सांगितले की, शाळेत झालेल्या या घटनेमुळे आम्ही सर्व पालकांची क्षमा मागतो. खाण्याचे जे काही साहित्य आणले आहे, त्याची चाचणी करणार आहोत. ही शाळा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली शाळा आहे. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.

संपादकीय भुमिका

  • विषबाधा झाल्यावर खाद्यपदार्थांची चाचणी करून काय उपयोग ? ती वेळीच न करणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !
  • अशी मागणी का करावी लागते ? शाळा प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ?