राज्यात राबवला जाणार ‘घर घर संविधान’ कार्यक्रम !

मुंबई – भारताच्या राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने ‘घर घर संविधान’ कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाद्वारे राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, सर्व महाविद्यालये, शासकीय वसतीगृहे, शासकीय निवासी शाळा, स्वराज्य संस्था, तसेच विधीमंडळ या ठिकाणी राज्यघटनेविषयी जागरूकता, घटनात्मक अधिकार आणि कर्तव्ये यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या अंतर्गत शाळेच्या प्रार्थनेमध्ये नियमित राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करणे, शाळांना राज्यघटनेच्या प्रती देणे, राज्यघटनेच्या मूल्यांवर आधारित पथनाट्य सिद्ध करणे, विविध स्पर्धा घेणे आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.