हरोली (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे पश्‍चिम महाराष्‍ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्‍प कार्यान्‍वित !

हरोली (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे कार्यान्‍वित सौरऊर्जा प्रकल्‍प !

कोल्‍हापूर – शेतकर्‍यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्‍यासाठी राज्‍यात मुख्‍यमंत्री ‘सौर कृषी वाहिनी योजना २.०’ राबवण्‍यात येत आहे. त्‍यामध्‍ये राज्‍यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्‍प उभारणीचे काम सध्‍या चालू असून पश्‍चिम महाराष्‍ट्रातील पहिला ३ मेगावॅट क्षमतेचा प्रकल्‍प हरोली (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे अवघ्‍या ६ महिन्‍यात कार्यान्‍वित झाला आहे. या प्रकल्‍पामुळे हरोली आणि जांभळी या गावांतील ७९० शेतकर्‍यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा चालू झाला आहे.

कोल्‍हापूर आणि सांगली जिल्‍ह्यात ८८ प्रकल्‍प प्रस्‍तावित !

मुख्‍यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्‍हापूर जिल्‍ह्यात ५४ ठिकाणी (एकूण क्षमता १७० मेगावॅट) आणि सांगली जिल्‍ह्यात ३४ ठिकाणी (एकूण क्षमता २०७ मेगावॅट) सौर प्रकल्‍प प्रस्‍तावित आहेत. या दोन्‍ही जिल्‍ह्यातील प्रकल्‍पांची एकत्रित क्षमता ३७७ मेगावॅट आहे. या प्रकल्‍पांपैकी अनेक प्रकल्‍प प्रगतीपथावर असून प्रकल्‍प पूर्ण झाल्‍यानंतर ७५ कृषी वाहिन्‍यांवरील शेतकर्‍यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे.

ग्रामपंचायतींना वार्षिक ५ लाख रुपये अनुदान !

या प्रकल्‍पास भूमी उपलब्‍ध करून देणार्‍या ग्रामपंचायतींना ५ लाख रुपये अनुदान देण्‍यात येत आहे. अशा पद्धतीने सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्‍प उभारणीस साहाय्‍य करणार्‍या राज्‍यातील ४११ ग्रामपंचायतींना पंतप्रधानांच्‍या हस्‍ते २० कोटी ५५ लाख रुपये विकासनिधी नुकताच ‘ऑनलाईन’ पद्धतीने देण्‍यात आला आहे.

दिवसा वीज मिळणे स्‍वप्‍नवत ! – तानाजी यशवंत माने, सरपंच, हरोली

आमच्‍या गावच्‍या भूमीवर उभारलेल्‍या ३ मेगावॅट क्षमतेच्‍या सौर ऊर्जा प्रकल्‍पामुळे भागातील शेतकर्‍यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्‍ध झाली आहे. रात्री शेतीला पाणी देण्‍यासाठी अनेक अडचणी येत होत्‍या, आता अशा अडचणींपासून शेतकर्‍यांची मुक्‍तता झालेली आहे. शेतकरी दिवसभर शेतीत काबाडकष्‍ट करून सायंकाळचा वेळ त्‍यांच्‍या कुटुंबासमवेत घालवू शकतो.

सौर प्रकल्‍प ग्राहक हिताचे ! – स्‍वप्‍नील काटकर, मुख्‍य अभियंता, महावितरण

वीज ग्राहक आणि शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्‍प हे फायद्याचे असून यामुळे शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. या प्रकल्‍पांमुळे येत्‍या काही वर्षांत विजेचे दर अल्‍प होण्‍यासही हातभार लागणार आहेत. दोन्‍ही जिल्‍ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींनी या पर्यावरणपूरक विकासकामात त्‍यांचा सहभाग नोंदवावा.