हिंदु समाजाला जागृत केल्यास दैदीप्यमान भारत निर्माण होईल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदूंनो, राष्ट्र-धर्म यांचे कार्य करण्यासाठी दुर्गादेवीकडे श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा यांचे मागणे मागा !

श्री दुर्गामाता दौडीत सहभागी धारकरी

सांगली, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – जसे मानवी शरिरातील हाडांचे काम त्या शरिराला उभे करणे हे आहे, तसेच देशाच्या उभारणीत हेच काम ‘श्रद्धा, त्याग आणि निष्ठा’ यांचे आहे. सद्य परिस्थितीत हिंदु समाज श्रद्धाहीन बनला असून तो राष्ट-धर्मनिष्ठा हरवून बसला आहे. या हिंदु समाजात राष्ट्रनिष्ठा आणि धर्मनिष्ठा निर्माण होण्यासाठी, तसेच भारतमातेला पुनरुज्जीवित करून दैदीप्यमान बनवण्यासाठी नवरात्रोत्सवात श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले.

६ ऑक्टोबर या दिवशी शहरात दुर्गादौड काढण्यात आली. त्या वेळी ते धारकर्‍यांना मार्गदर्शन करत होते. पू. संभाजीराव भिडे गुरुजी म्हणाले की, छत्रपती शिवराय आई भवानीमातेचे आर्त भक्त होते. हीच राष्ट्र-धर्मनिष्ठा आणि भक्ती यांच्या जोरावर अत्याचारी रांझ्याचा पाटील याला चौरंगा बनवून शिक्षा करण्यात कामी आली. आज मात्र असे दिसत नाही. आई श्री दुर्गामातेकडे हीच ‘श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा’ मागूया.