सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या नवचंडी यागाचे थेट प्रक्षेपण पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

वर्ष २०२४ च्या मे मासात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवचंडी याग करण्यात आला. त्या वेळी देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील साधकांना त्याचे ‘लाइव्ह स्ट्रीम’ प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. त्या वेळी देवद आश्रमातील सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५९ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. यागाच्या पहिल्या दिवशी आलेली अनुभूती

अ. ‘२८.५.२०२४ या दिवशी याग चालू होण्यापूर्वी मला वातावरणात पुष्कळ उष्मा जाणवत होता. याग चालू झाल्यानंतर वातावरणात पालट होऊन मला गारवा जाणवू लागला.

आ. माझ्या भोवतीचे अनिष्ट शक्तीचे आवरण वेगाने न्यून होत असल्याचे मला जाणवले.

इ. यागातील मंत्रपठण ऐकतांना ‘गेल्या १ मासाच्या कालावधीत मला आलेला थकवा हळूहळू न्यून होत आहे’, असे मला वाटले.

ई. यागाच्या शेवटी पूर्णाहुती झाल्यावर मला डोळ्यांसमोर क्षणभर देवीचा नथ घातलेला मुखवटा दिसला.

सुश्री (कु.) नलिनी राऊत

२. यागाच्या दुसर्‍या दिवशी आलेल्या अनुभूती

अ. २९.५.२०२४ या दिवशी सायंकाळी ७.३० वा. यागाला आरंभ झाल्यानंतर सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यज्ञस्थळी पूजा केलेल्या देवीविषयी माहिती सांगत होते. त्या वेळी मला आकाशात ढगांच्या आकारात तशाच प्रकारचे देवीचे रूप दिसले. त्यानंतर मला ढगांच्या आकारात देवीची मोरावर बसलेली देवी आणि अष्टभुजा देवी अशी रूपे दिसली. त्या वेळी मला ‘नवचंडी यागासाठी देवी प्रत्यक्ष आली आहे’, असे जाणवले आणि माझा भाव जागृत झाला.

आ. यागाच्या ठिकाणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून, तसेच मंत्रपठण ऐकतांना माझा भाव सातत्याने जागृत होत होता.

इ. श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि श्री. निषाद देशमुख ‘कलियुग के नारायण का रहस्य’ सांगत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रति पुष्कळ कृतज्ञता वाटली. (‘कलियुग के नारायण का रहस्य’ म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कलियुगातील अवतारकार्याची महती.)

३. यागाच्या तिसर्‍या दिवशी आलेली अनुभूती

३०.५.२०२४ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देवीची आरती करतांना पाहून ‘देवीच देवीची आरती करत आहेत’, असे मला वाटले. त्या वेळी मला वातावरणात पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

हे गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळेच मला या अनुभूती आल्या. ही सूत्रे तुम्हीच लिहून घेतलीत, याविषयी तुमच्या कोमल चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.६.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक