मराठी भाषेला अभिजात दर्जा हा सर्वांसाठी सुवर्णक्षण ! – पंतप्रधान

पंतप्रधानांचे आभार मानण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने ‘अभिजात मराठी सन्मान सोहळ्या’चे आयोजन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई – मराठीमुळे देशाची सांस्कृतिक विविधता अधिक समृद्ध झाली आहे. त्यामुळे या भाषेचा अभिजात भाषा म्हणून करण्यात आलेला सन्मान हा संपूर्ण देशाने छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त केलेला मानाचा मुजरा आहे. आजचा हा दिवस मराठीसाठी सुवर्णक्षण आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी वांद्रे-कुर्ला संकुलातील एन्.सी.पी.ए. सभागृहात काढले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे पंतप्रधानांचे आभार मानण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ‘अभिजात मराठी सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केंद्र सरकारचे आभार मानण्यासाठी म्हणून पंतप्रधान मोदी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याविषयी महाराष्ट्र आणि जगभरातील मराठीप्रेमींचे अभिनंदन ! मराठी भाषेचा इतिहास समृद्ध असून या भाषेतून जे ज्ञानामृत निघाले, ते अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरले असून आजही आपल्याला मार्गदर्शन करतात’, असे मोदींनी सांगितले.

या वेळी मराठी भाषेच्या विविध क्षेत्रांतील योगदानाचा गौरव करण्यात आला. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हे मराठीजनांचे स्वप्न साकारण्यात योगदान देता आले, याचा मनस्वी आनंद झाल्याचे सांगून मोदी यांनी मराठीसह बंगाली, पाली, आसामी भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याविषयी त्या भाषिकांचे अभिनंदन केले.

या सोहळ्यास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मराठी भाषामंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.