वणी येथील श्री सप्तशृंगीदेवीच्या (सिंदूरविरहित) मूळ मूर्तीच्या छायाचित्राकडे पाहून भाव जागृत होण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तशृंगीदेवीच्या मूर्तीची वर दिलेली दोन्ही छायाचित्रे मी संकेतस्थळावर पाहिली. तेव्हा ‘छायाचित्र क्र. १ च्या (सप्तशृृंंगीदेवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्याच्या पूर्वीच्या छायाचित्राच्या) तुलनेत छायाचित्र क्र. २ कडे (सप्तशृृंंगीदेवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढलेल्या छायाचित्राकडे) पाहिल्यावर चैतन्य जाणवते आणि भाव जागृत होतो’, असे मला जाणवले.

श्री सप्तशृगीदेवीच्या मूर्तीचे शेंदूर काढण्यापूर्वीचे छायाचित्र
श्री सप्तशृृंगीदेवीच्या मूळ मूर्तीचे शेंदूर काढल्यानंतरचे छायाचित्र

१. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून प्रवाहित झालेल्या गिरिजा नदीचे रूप म्हणजे आदिशक्तीचे मूळ स्थान असलेले स्वयंभू शक्तीपीठ ‘श्री सप्तशृृंंगीदेवी’ !

सौ. मधुरा कर्वे

‘भागवत पुराण आणि सप्तशती पाठात उल्लेख केल्याप्रमाणे १०८ शक्तीपिठे आहेत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी वणी (नाशिक) येथील सप्तशृृंंगीमाता ही देवी अर्धे स्वयंभू शक्तीपीठ मानले जाते. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून प्रवाहित झालेली गिरिजा नदी, म्हणजे ‘श्री सप्तशृृंंगीदेवी’ होय. हे आदिशक्तीचे मूळ स्थान मानले जाते.

२. साधारण १००० वर्षांपासून श्री सप्तशृृंंगीदेवीच्या मूर्तीवर लेपन केलेल्या शेंदुराचा जमा झालेला २००० किलोचा लेप काढण्यात आल्यावर देवीचे मोहक रूप दिसणे

सौ. प्रियांका गाडगीळ

२१.७.२०२२ पासून आदिशक्ती सप्तशृृंंगीदेवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम आरंभ झाले होते. त्यानंतर दीड मासाने या मूर्तीवरील २००० किलो शेंदूर काढण्यात आला. त्यामुळे देवीचे मूळ स्वरूप दिसू लागले आहे. श्री सप्तशृृंंगीदेवीच्या पारंपरिक मूर्तीपेक्षा हे मोहक स्वरूप वेगळे असून ते पहातांना भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. साधारण १००० वर्षांपासून देवीवर लेपन केलेल्या शेंदुराचा थर या मूर्तीवर जमा झाला होता. हा लेप धार्मिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला.

३. शेंदुरामध्ये ‘शिसे’ हा धातू असल्यामुळे वातावरणातील घटकांच्या परिणामांमुळे त्याचा रंग काळपट होऊ शकणे, त्यामुळे मूर्तीतून त्रासदायक स्पंदनांचे प्रक्षेपण होणे

पुरातन काळापासून हिंदु संस्कृतीमध्ये पाषाणामध्ये अत्यंत सुबक मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. श्री सप्तशृृंंगीदेवीची मूर्ती ही त्यांपैकी एक उदाहरण आहे. या मूर्तीवर शेंदुराचे लेपन पूर्वापार चालू आहे. देवतांना शेंदुराचे लेपन करतांना तो तेलामध्ये खलून लावला जातो. शेंदुरामुळे मूर्तीची सूक्ष्म नादलहरी आकृष्ट करण्याची आणि ती शक्तीचे प्रक्षेपण करण्याची क्षमता वाढते. शेंदुरामध्ये ‘शिसे’ हा धातू असल्यामुळे वातावरणातील घटकांच्या परिणामांमुळे त्याचा रंग काळपट होऊ शकतो. त्यामुळे मूर्तीतून प्रक्षेपित होणारी चांगली स्पंदने अल्प होऊन तिच्यातून त्रासदायक स्पंदनांचे प्रक्षेपण होते.

४. शेंदुराच्या लेपनामुळे मूर्तीतील बारकावे आणि देवीचे मूळ रूप दिसून न येणे

अनेक वर्षांपासून केलेल्या या शेंदूर लेपनामुळे देवीच्या मूर्तीवरील मूळचे बारकावे, तपशील, दागिने आणि या देवीचे मूळ रूप दिसून येत नाही. त्यामुळे मूर्ती बटबटीत दिसू लागते, उदा. आतापर्यंत ‘(शेंदूरलेपन केलेल्या) श्री सप्तशृृंंगीदेवीने तिचे नेत्र डावीकडे झुकवले आहेत’, असे वाटत होते; परंतु ‘मूळ मूर्ती ही सरळ आणि समोर पहात आहे,’ असे दिसते. त्यामुळे भाव जागृत होतो.

५. स्वयंभू मूर्ती, संतांनी स्थापन केलेली मूर्ती आणि शास्त्रानुसार बनवलेली मूर्ती या सात्त्विक मूर्ती असून त्या पहातांना पहाणार्‍याचा अन् भाविकाचा भाव जागृत होणे

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता, म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात. ऋषिमुनी आणि संत यांना देवतांचा जसा साक्षात्कार झाला, तशी त्यांनी देवतांची वर्णने शास्त्रांत केली आहेत. स्वयंभू मूर्ती, संतांनी स्थापन केलेली मूर्ती आणि शास्त्रानुसार बनवलेली मूर्ती यांमध्ये देवतेचे तत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते. अशी सात्त्विक मूर्ती पहातांना ती पहाणार्‍याचा अन् भाविकाचा भाव जागृत होतो. त्या देवतेच्या तत्त्वाचा, मूर्तीतील देवपणाचा लाभ समष्टीला (समाजाला) होतो. तिच्या अस्तित्वाने सार्‍या वायूमंडलाची शुद्धी होते.

६. मूळ मूर्तीवर शेंदूरलेपन न करता उत्सवमूर्तीवर शेंदूरलेपन केल्यास मूळ मूर्तीचे पावित्र्य अनादी काळासाठी टिकून राहू शकणे

देवीची मूळ मूर्ती आणि तिच्यावर अनेक वर्षांपासून केलेल्या शेंदूर लेपनाची आवरणे यांच्यामध्ये कालांतराने शेंदूर सुकल्यामुळे पोकळी निर्माण होते. हवेतील रासायनिक प्रक्रियेमुळे मूळ मूर्तीलासुद्धा धोका संभवू शकतो. त्यामुळे मूळ मूर्तीवर शेंदूरलेपन न करता उत्सवमूर्तीवर ते केल्यास किंवा अन्य पद्धतीने शेंदूरलेपन केल्यास मूळ मूर्तीचे पावित्र्य अनादी काळासाठी टिकून राहील आणि पुढील पिढ्यांनासुद्धा त्याचा लाभ घेता येईल.’

– सौ. प्रियांका गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, डोंबिवली.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

७. श्री सप्तशृृंंगीदेवीच्या मूर्तीच्या छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या चाचण्या

७ अ. शेंदूर काढल्यामुळे देवीच्या मूर्तीतील नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात घटून तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्मक ऊर्जेचे (चैतन्याचे) प्रमाण पुष्कळ वाढणे : ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने श्री सप्तशृृंंगीदेवीच्या मूर्तीच्या छायाचित्रांच्या चाचण्या ‘यू.ए.एस्.’ (‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’) या उपकरणाद्वारे करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणे पुढे दिली आहेत. यातून लक्षात येते की, शेंदूर काढल्यामुळे देवीच्या मूर्तीतील नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात घटले आणि तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्मक ऊर्जेचे (चैतन्याचे) प्रमाण पुष्कळ वाढले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.