‘ईशा फाऊंडेशन’च्‍या आश्रमावर धाड टाकली, तशी चर्च आणि मदरसे यांवर कधी टाकणार ? – हिंदु जनजागृती समिती

तमिळनाडू सरकारने सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव यांच्‍या आश्रमावर धाड टाकल्‍याचे प्रकरण

मुंबई – मद्रास उच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट झालेल्‍या एका याचिकेवर सुनावणी झाल्‍यानंतर सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव यांच्‍या कोइम्‍बतूर येथील ‘ईशा फाऊंडेशन’च्‍या आश्रमात पोलिसांनी धाड टाकली. २ सज्ञान मुलींनी संन्‍यास दीक्षा घेतली; म्‍हणून त्‍यांच्‍या वडिलांनी खटला प्रविष्‍ट केला. या वेळी तामिळनाडूतील स्‍टॅलिन सरकारने १५० पोलिसांचा फौजफाटा आश्रमात पाठवला होता. एखाद्या मुलीने संन्‍यासाश्रम स्‍वीकारला म्‍हणून इतका मोठा फौजफाटा ? या प्रकरणी संपूर्ण आश्रमाची ज्‍याप्रमाणे पडताळणी केली गेली, अशी पडताळणी कधी कोणत्‍या चर्च आणि मदरसा यांमध्‍ये धाड टाकून स्‍टॅलीन सरकारने केली आहे का ? असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीने विचारला आहे.
समितीने या पत्रकात पुढे म्‍हटले आहे की, तमिळनाडूचे ‘स्‍टॅलिन सरकार’ हे सनातन धर्मविरोधी असल्‍यानेच अशी कारवाई केली गेली. हिंदुबहुल देशात हिंदूंच्‍या आश्रमांवर एखाद्याने संन्‍यास घेतल्‍यामुळे धाड टाकली जाते, हे अतिशय निंदनीय असून हिंदु जनजागृती समिती या घटनेचा तीव्र शब्‍दांत निषेध करते.

 

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी या पत्रकात पुढे म्‍हटले आहे की,

 

१. सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव आणि त्‍यांची ‘ईशा फाऊंडेशन’ सामाजिक, राष्‍ट्रीय आणि आध्‍यात्‍मिक क्षेत्रांत मोठे योगदान देऊन भारताचे नाव विश्‍वभरात मोठे करत आहे. या फाऊंडेशनद्वारे देशभरात समाजहितासाठी अनेक उपक्रम राबवले जातात.

२. अशा संस्‍थांवर त्‍या जणू अतिरेक्‍यांचा अड्डा असल्‍याप्रमाणे धाडी घातल्‍या जातात, हे संशयास्‍पद असून हा हिंदु संस्‍थांची समाजात हेतूतः अपकीर्ती करण्‍याचा प्रयत्न आहे.

३. नुकत्‍याच १४ वर्षांच्‍या मुलीवर २ वर्षे अत्‍याचार करणार्‍या रघुराजकुमार नावाच्‍या पाद्य्राला पोक्‍सो कायद्याच्‍या अंतर्गत तक्रार नोंदवूनही महिनाभर तमिळनाडू पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही आणि तो पाद्री पसार झाला.

४. एकीकडे अल्‍पवयीन मुलीवर २ वर्षे इतका अत्‍याचार होऊनही पोलिसांची उदासीनता आणि दुसरीकडे सज्ञान मुलीने स्‍वखुशीने संन्‍यास स्‍वीकारला, म्‍हणून आश्रमात १५० पोलिसांची धाड ! यातूनच तमिळनाडू सरकारचा सनातन हिंदु धर्माचा द्वेष आणि ख्रिस्‍ती लांगूलचालन स्‍पष्‍ट होते.

५. ‘सायरो मलंकारा कॅथोलिक चर्च’चे पाद्री बेनेडिक्‍ट अँटो यांच्‍यावर महिलांवर अत्‍याचार केल्‍याचा आरोप झाला होता. तमिळनाडूमध्‍ये ख्रिस्‍ती पाद्य्रांकडून महिलांचे लैंगिक शोषण झाल्‍याच्‍या अनेक घटना उघडकीस येत आहेत; मात्र तमिळनाडू सरकारने अशा किती चर्चसंस्‍थांवर धाडी घातल्‍या ?

६. सनातन धर्माला डेंग्‍यू, मलेरिया यांची उपमा देऊन सनातन धर्म संपवण्‍याची भाषा करणारे तमिळनाडूतील स्‍टॅलीन सरकार आणि द्रविड मुनेत्र कळघम् (डी.एम्.के.) पक्षाकडून आणखी काय वेगळी अपेक्षा करणार ? त्‍यामुळे ‘ईशा फाऊंडेशन’वर झालेल्‍या द्वेषपूर्ण कारवाईच्‍या प्रकरणाची केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.

हिंदु जनजागृती समितीची प्रेसनोट 

संपादकीय भूमिका

तमिळनाडूमध्‍ये हिंदुद्वेषी द्रमुक सरकार असल्‍यामुळे तेथील हिंदु समाज, संत आणि त्‍यांचे आश्रम असुरक्षित आहेत, हे जाणा. असे आघात रोखायचे असतील, तर परिणामकारक हिंदूसंघटन आवश्‍यक !