India On Pakistan in UN : पाकिस्‍तान जगासाठी धोकादायक देश ! – भारत

भारताने संयुक्‍त राष्‍ट्रांत पाकला पुन्‍हा सुनावले

न्‍यूयॉर्क (अमेरिका) –  पाकिस्‍तान जगासाठी धोकादायक आहे. जगातील सुरक्षेसाठी तो मोठे आव्‍हान आहे. सीमेपलीकडून कारवाया करणे, हा त्‍यांतील एक भाग आहे, अशा शब्‍दांत भारताने संयुक्‍त राष्‍ट्रांत पुन्‍हा एकदा पाकला फटकारले.

भारताने पुढे म्‍हटले की,

१. आतंकवादाशी कसे लढायचे, यावर जगात अद्याप एकमत होऊ शकत नाही.

२. अमेरिकेतील वर्ल्‍ड ट्रेड सेंटरच्‍या इमारतींवर झालेल्‍या आक्रमणानंतर जगाला आतंकवादाच्‍या सूत्रावरून जाग आली. नोव्‍हेंबर १९९६ मध्‍ये भारताने पहिल्‍यांदा जागतिक आतंकवादावर एक व्‍यापक चर्चेसाठी पुढाकार घेतला होता. जवळपास याला ३० वर्षे झाली, तरीही एकमत होऊ शकले नाही.

३. जेव्‍हा जगाने आतंकवादाला गांभीर्याने घेतले नाही, तेव्‍हापासून भारत सीमेपलीकडून होणार्‍या आतंकवादाचा सामना करत आहे. मागील ३ दशकात भारतात आतंकवादी आक्रमणांमुळे सहस्रो लोक मारले गेले. भारत शून्‍य सहनशीलता दाखवून आतंकवादाशी लढेल.

४. आपल्‍यातील काही देश राजकीय धोरण डोळ्‍यांसमोर ठेवून आतंकवादाला योग्‍य ठरवण्‍याचा प्रयत्न करतात, हा दुर्दैवी प्रकार आहे. अशा देशांमुळे आतंकवादाशी लढण्‍याच्‍या संकल्‍पाला धक्‍का पोचतो. याच देशांमुळे १५ वर्षांनंतरही मुंबईवरील आक्रमणातील सूत्रधार आजही सरकारी सुविधेत वेगवेगळ्‍या देशात फिरतो. हे देश केवळ आतंकवादाला प्रोत्‍सहन देत नाही, तर त्‍यांच्‍या सरकार आणि यंत्रणा यांच्‍याकडून स्‍वत:साठी धोरणे बनवतात.

५. स्‍वतःच्‍या अशा धोरणाकडे जगाचे लक्ष जाऊ नये, यासाठी दिशाभूल करत हे देश स्‍वत: आतंकवाद पीडित असल्‍याचे जगाला दाखवत असतात. संयुक्‍त राष्‍ट्रांकडून बंदी घालण्‍यात आलेल्‍या आतंकवादी संघटना लष्‍कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद भारताच्‍या भूमीवर आक्रमण करत रहातात. त्‍याविरोधात कारवाई करण्‍याची आजची आवश्‍यकता आहे.

संपादकीय भूमिका

निर्लज्‍ज पाकला शब्‍दांची नाही, तर शस्‍त्रांचीच भाषा समजत असल्‍याने भारताने त्‍याच भाषेत त्‍याला सांगण्‍याची आवश्‍यकता आहे !