(म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘व्होट जिहाद’ म्हणून गृहमंत्री फडणवीस यांनी समतेच्या मूल्यांचा अवमान केला ! – नाना पटोले, काँग्रेस

गृहमंत्री फडणवीस आणि काँग्रेसचे नाना पटोले

मुंबई – ‘लव्ह जिहाद’, ‘व्होट जिहाद’ अशी वक्तव्ये गृहमंत्र्यांनी करणे हे लाजिरवाणे आहे. हे त्यांचे व्यक्तीगत मत नाही, तर ते गृहमंत्री म्हणून बोलत आहेत. ‘व्होट जिहाद’ म्हणून देवेंद्र फडणवीस समतेच्या मूल्यांचा अवमान केला आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्राची जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

लव्ह जिहाद, व्होट जिहाद या हिंदु धर्मावरील षड्यंत्राकडे डोळेझाक करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना नाना पटोले म्हणाले, ‘‘फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच ठाऊक नाही. महाराजांच्या सैन्यात अठरापगड जातीच्या मावळ्यांसह मुसलमानही होते. महाराष्ट्राने देशाला समतेचा संदेश दिला. त्याच राज्याचा गृहमंत्री ‘लव्ह जिहाद’, ‘व्होट जिहाद’ अशी वक्तव्ये करतो, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. लव्ह जिहादच्या प्रकारांवर कारवाई केली पाहिजे. कारवाईचे अधिकार त्यांच्याकडे आहेत, मग कारवाई का नाही ? त्यांच्याच पक्षाचे आमदार एका धर्माला शिव्या देत महाराष्ट्र तोडण्याचे पाप करत आहेत. महायुतीचे अडीच वर्षांतील अपयश आणि भ्रष्टाचार झाकण्यासाठी फडणवीस अन् महायुतीचे अन्य नेते यांच्याकडून धार्मिक तणाव निर्माण करणारी वक्तव्ये केली जातात; पण सूज्ञ जनता बधणार नाही.’’

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे मुसलमान होते. कुठल्याही मुसलमानाला महत्त्वाचे पद देण्यात आले नव्हते, असे पुरावे आहेत. खोट्या संकल्पनेच्या (नॅरेटिव्हच्या) आधारे त्यांना सर्वधर्मसमभावी दाखवण्याचा निधर्मी आणि साम्यवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडायला हवा !

संपादकीय भूमिका :

काँग्रेस मतांसाठी आणखी किती मुसलमानांचे लांगूलचालन करणार ?