प्रतिदिन राज्यभरातून येणार्‍या सहस्रो वारकर्‍यांची पंढरपूर येथे लूटमार !

पंढरपूरसह अन्य तीर्थक्षेत्री रिक्शाचालकांवर नियंत्रण ठेवण्याची ‘सुराज्य अभियाना’ची मागणी !

डावीकडून सोलापूर साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विजय तिराणकर, श्री. दत्तात्रेय पिसे, श्री. किशोर पुकाळे आणि श्री. राजेंद्र पलनाटी

सोलापूर – महाराष्ट्रासह विविध राज्यांतून प्रतिदिन २५ ते ३० सहस्र वारकरी, तसेच अन्य भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठुमाऊलींच्या दर्शनाठी येतात. वारीच्या कालावधीत ही संख्या काही लाखोंच्या घरात असते. यांतील बहुतांश भाविक हे एस्.टी. बस आणि रेल्वे यांद्वारे येतात. पंढरपूर येथे शहरी बस वाहतूक नसल्यामुळे बस आणि रेल्वेस्थानक येथून श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येण्या-जाण्यासाठी ‘रिक्शा’ हाच एकमात्र पर्याय भाविकांपुढे आहे. यासाठी रिक्शाचालकांकडून रिक्शेच्या मीटरनुसार बसस्थानकावरून ३० रुपये, तर रेल्वेस्थानकावरून ५० रुपये भाडे आकारणे आवश्यक असतांना अनुक्रमे १५० आणि २०० रुपये भाडे आकारून वारकर्‍यांची लूट केली जात आहे. सर्वसामान्य वारकर्‍यांची उघडपणे होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी राज्य प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. ही लूटमार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना काढावी, अशी मागणी सोलापूर हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. दतात्रेय पिसे यांनी सोलापूर साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विजय तिराणकर यांच्याकडे केली. या वेळी सर्वश्री राजेंद्र पलनाटी आणि किशोर पुकाळे उपस्थित होते.

३० ते ५० रुपयांचे रिक्शाभाडे १५० ते २०० रुपयांवर !

पंढरपूर बसस्थानक ते श्री विठ्ठल मंदिरापर्यंतचे अंतर दीड किलोमीटर, तर पंढरपूर रेल्वेस्थानक ते श्रीविठ्ठल मंदिरापर्यंतचे अंतर हे २ किलोमीटर आहे. येथे रिक्शाचालक मीटरनुसार भाडे आकारत नाहीत. अनेकदा रिक्शाचालक व्यक्ती नवीन असल्याचे पाहून १५० ते २०० रुपयांपर्यंत भाडे आकारतात. अन्य पर्याय नसल्यामुळे भाविकांना अधिकचे भाडे देण्यावाचून पर्याय नसतो. रिक्शाचालकांनी योग्य भाडे घेतले, सर्वांचा लाभ होईल, असेही श्री. पिसे यांनी सांगितले.

सुराज्य अभियानने दिलेले प्रसिद्धीपत्रक –

परिवहन विभागाला सुचवल्या उपाययोजना !

श्री. दत्तात्रय पिसे

याविषयीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, परिवहन विभागाचे सचिव, परिवहन आयुक्त आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आले आहे. यात सुचवलेल्या उपाययोजनांमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या मार्गावर येण्या-जाण्यासाठीचे रिक्शाभाडे निश्चित करून त्याचे दरफलक रिक्शा स्टँड आणि मंदिर येथे लावणे, ठरवलेल्या दराहून अधिक भाडे आकारणार्‍या रिक्शाचालकांच्या विरोधात तक्रार करता यावी, यासाठी फलकांवर ‘हेल्पलाईन क्रमांक’ (साहाय्यता क्रमांक) देणे, परिवहन अधिकार्‍यांनी अचानक भेट देऊन अधिक दर आकारणार्‍यांवर दंडात्मक कार्यवाही करणे, भाविकांसाठी विनामूल्य अथवा अल्पदरात वाहन व्यवस्था उपलब्ध करून देणे आदी सूचनांचा समावेश आहे. यासह हा विषय केवळ पंढरपूर तीर्थक्षेत्रापुरताच मर्यादित नसून राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्री असे घडते का ?, याचे सखोल अन्वेषण करून त्यावर योग्य कार्यवाही करावी, अशीही मागणी ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे. ‘लाखो वारकर्‍यांची होणारी आर्थिक लूटमार थांबवून परिवहन विभागाने विठुमाऊलीचा कृपाशीर्वाद मिळवावा’, असे आवाहन श्री. पिसे यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

ज्या ठिकाणी मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही, त्या सर्वच ठिकाणी रिक्शाच्या भाड्याच्या ठिकाणानुसार दरपत्रक फलक लावला गेला पाहिजे !