Garba Love Jihad : गरब्यात सहभागी होण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य असायला हवे !
मध्यप्रदेशाच्या माजी मंत्री उषा ठाकूर यांची मागणी
भोपाळ (मध्यप्रदेश) – नवरात्रोत्सवाच्या काळात गरब्यात सहभागी होण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य असायला हवे, असे माझे मत आहे. जो येईल त्याने त्याची ओळख लपवू नयेे. तुमच्या कुटुंबासह तुम्ही गरब्यात सहभागी व्हा, काही अडचण नाही; पण तुम्ही तुमची ओळख लपवून ‘लव्ह जिहाद’ करू शकत नाही. ही मोहीम गेली २० वर्षे अखंडपणे चालू असून आज प्रत्येक पंडाल जागरूक आणि सतर्क आहे. मी मुख्यमंत्री मोहन यादव यांची भेट घेऊन याविषयी चर्चा करणार आहे, अशी माहिती राज्याच्या माजी मंत्री उषा ठाकूर यांनी दिली.
शस्त्रास्त्रांचा सराव करा आणि धर्मग्रंथांचा अभ्यास करा
उषा ठाकूर पुढे म्हणाल्या की, नवरात्रीचा उत्सव हा शक्ती आणि ध्यान यांचा उत्सव आहे. संपूर्ण समाजाने स्वतःची शक्ती वाढवली पाहिजे. शस्त्रास्त्रांचा सराव करा आणि धर्मग्रंथांचा अभ्यास करा, हीच अपेक्षा सर्व सनातनी हिंदूंकडून आहे.
बलात्कार्यांना भर चौकात फाशी द्या !
उषा ठाकूर बलात्कारांच्या घटनांवर म्हणाल्या की, समाजात भौतिकवादाच्या अतिरेकामुळे कुठेतरी आध्यात्मिक साधना अल्प झाली आहे. यामुळे संपूर्ण सामाजिक जडणघडण आणि मानवता यांना तडे जात आहेत. लैंगिक शोषण करणार्या नर पिशाचांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. लहान मुलींवर बलात्कार करणार्यांना सार्वजनिक चौकात फाशी देण्यात यावी आणि त्यांचे अंत्यसंस्कार करू नयेत. इतर लोक जेव्हा अशी शिक्षा पहातील, तेव्हा ते मुलींकडे वाईट दृष्टीने पहाण्याचे धाडस करणार नाहीत.