हिंदु धर्माकडे वाकड्या दृष्टीने पहाणार्‍या धर्मद्रोह्यांना हिंदूंनी ‘जशास तसे’ उत्तर द्यावे ! – नितेश राणे, आमदार, भाजप

बत्तीस शिराळा येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा !

नितेश राणे (संग्रहित छायाचित्र)

बत्तीश शिराळा (जिल्हा सांगली), २२ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु धर्म आणि हिंदू यांच्याकडे वाकड्या दृष्टीने पाहिल्यास हिंदूंनी धर्मद्रोह्यांना ‘जशास तसे’ उत्तर देण्याची सिद्धता ठेवावी. हिंदु देवतांकडे वाकड्या दृष्टीने पाहिले, तर आम्ही हे सहन करणार नाही. धर्मांधांचे अत्याचार हिंदूंनी का सहन करायचे ? धर्मांधांना आपण थांबवू शकलो नाही, तर आपल्याला सण साजरे करता येणार नाही. जोपर्यंत आपल्यात कडवटपणा निर्माण होत नाही, तोपर्यंत धर्मद्रोही ज्ञानेश महाराव यांच्यासारखे येत-जात रहातील. महंमद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह बोलला असता, तर ज्ञानेश महाराव यांची अंत्ययात्रा निघाली असती, असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी येथे केले. धर्मद्रोही ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याविरुद्ध टीका केल्याच्या निषेधार्थ येथे जनआक्रोश मोर्चा आणि जाहीर सभा झाली. महाराव यांच्यावर देशद्रोह्याचा गुन्हा नोंदवून कारवाईची मागणी करण्यात आली.

टाळ मृदंग घेऊन मोर्चात सहभागी झालेले बालवारकरी

अंबामाता मंदिर, मरिमी चौक, सोमवार पेठ, कुरणे गल्ली, पूल गल्ली, बसस्थानक मार्गे तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय शिवाजी जय भवानी’, ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’, ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणा धर्मप्रेमींनी दिल्या. या मोर्च्यात धर्मप्रेमींनी भगव्या टोप्या, तर महिलांनी भगवी वस्त्रे आणि भगवी टोपी घातली होती. भाजपचे आमदार श्री. नितेश राणे, सर्वश्री सुनील धुमाळ, अनिल देवळेकर यांची भाषणे झाली. या वेळी श्री अनिल महाराज, सर्वश्री सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, सुखदेव पाटील, पृथ्वी नाईक, केदार नलवडे, सम्राट शिंदे, कुलदीप निकम, जयसिंगराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार श्री. नितेश राणे पुढे म्हणाले की, आज आपण घेत असलेली निषेध सभा कधी मुसलमानांनी काढलेले आपण पाहिले आहे का ? इस्लाम पंथ आणि त्यांच्या महंमद पैगंबर यांच्या विरोधात कुणी आक्षेपार्ह बोलले असते, तर मुसलमान लोक नुसत्या टोप्या घालून ते घोषणा देत बसले असते का ? हा प्रश्न हिंदूंना विचारायचा आहे. सर्व गोष्टी हिंदूंनीच सहन करावे, असे वातावरण सिद्ध झालेले आहे. सर्वधर्मसमभाव, भाईचारा, गंगा जमुना तैहजीब करण्याविषयी केवळ हिंदूंना सांगितले जाते. आपण हिंदु राष्ट्र म्हणतो, त्या राष्ट्रात ११ ठिकाणी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत दगडफेक झाली आहे. सर्वधर्मसमभाव आहे तर ही दगडफेक कशासाठी ? ईदची जुलूस निघाली, तेव्हा हिंदूंनी त्या मिरवणुकीवर दगडफेक केल्याची एकही घटना घडलेली नाही.