Tirupati Laddu Case : माजी मुख्‍यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्‍या लाडवांचे प्रकरण

आंध्रप्रदेशाचे माजी मुख्‍यमंत्री वाय.एस्. जगन मोहन रेड्डी

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशाचे माजी मुख्‍यमंत्री वाय.एस्. जगन मोहन रेड्डी आणि इतर यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. तिरुपतीच्‍या श्री व्‍यंकटेश्‍वर बालाजी मंदिराच्‍या पावित्र्याला हानी पोचवल्‍याचा आणि लाडू प्रसादामध्‍ये वापरल्‍या जाणार्‍या तुपात भेसळ झाल्‍याने हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍याचा आरोप त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे. तेलंगाणाच्‍या भाग्‍यनगरमधील सैदाबाद पोलीस ठाण्‍यात एका अधिवक्‍त्‍याने तक्रार केल्‍यानंतर हा गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

न्‍यायालयांमध्‍ये याचिका

१. हिंदू सेना समितीचे अध्‍यक्ष सुरजितसिंह यादव यांनी तिरुपती प्रसादम्‌मधील प्राण्‍यांच्‍या चरबीच्‍या आरोपांची विशेष अन्‍वेषण पथकाद्वारे चौकशी करण्‍याची मागणी केली आहे. सुरजितसिंह यादव यांनी २१ सप्‍टेंबरला सर्वोच्‍च न्‍यायालयात जनहित याचिका प्रविष्‍ट (दाखल) करून ही मागणी केली आहे. याखेरीज अधिवक्‍ता सत्‍यम सिंह यांनीही सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे.

२. दुसरीकडे वाय.एस्.आर्.ने आंध्रप्रदेश उच्‍च न्‍यायालयात या प्रकरणाची वर्तमान न्‍यायाधिशांच्‍या देखरेखीखाली चौकशी करण्‍याची विनंती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ सप्‍टेंबरला होणार आहे.

३. केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने आंध्रप्रदेश सरकारकडून लाडवांच्‍या संदर्भात अहवाल मागवला आहे. आरोग्‍यमंत्री जे.पी. नड्डा म्‍हणाले की, मी मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्‍याशी बोललो आहे. मंदिराच्‍या प्रसादाच्‍या लाडवांचे परीक्षण केले जाईल.

४. तेलगु देसम्, काँग्रेस आणि भाजप यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे !  – श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर

हिंदूंच्‍या भावना दुखावल्‍या गेल्‍या आहेत. याला क्षमा करता येणार नाही. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्‍यांची सर्व मालमत्ता जप्‍त करण्‍यात यावी आणि जो कुणी या प्रक्रियेत दूरस्‍थपणे सहभागी असेल त्‍याला तुरुंगात टाकावे, अशी मागणी श्री श्री रविशंकर यांनी केली आहे.

उपमुख्‍यमंत्री पवन कल्‍याण प्रायश्‍चित्त म्‍हणून ११ दिवसांचा उपवास करणार

आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण

आंध्रप्रदेशाचे उपमुख्‍यमंत्री पवन कल्‍याण यांनी एक्‍स वर पोस्‍ट करत म्‍हटले की, श्री तिरुपती बालाजी देवस्‍थानाच्‍या प्रसादात भेसळ करून जी अपवित्रता पसरवण्‍याचा प्रयत्न केला गेला, त्‍याविषयी मला मनापासून दुःख वाटत आहे. खरे सांगायाचे तर मला ‘माझीच फसवणूक झाली’, असे वाटत आहे. त्‍यामुळे प्रभु वेंकटेश्‍वरकडे मी प्रार्थना करतो की, त्‍याची कृपादृष्‍टी आमच्‍यावर आणि सर्व सनातन्‍यांवर कायम राहू दे. मी या क्षणापासून आता देवासमोर प्रायश्‍चित्त करून क्षमा मागत आहे. यासाठी मी ११ दिवसांचा उपवास करण्‍याचा धर्म संकल्‍प सोडत आहे. उपवासाच्‍या शेवटच्‍या दिवशी १ किंवा २ ऑक्‍टोबर या दिवशी मी स्‍वतः तिरुपती बालाजीच्‍या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन देवाची क्षमा मागणार आहे.