नंदुरबार मिरवणुकीत धर्मांधांनी चिथावणी देत औरंगजेबासह टिपू सुलतानचा फलक झळकावल्याने दंगल उसळली ! – पोलिसांची माहिती

प्रतिकात्मक चित्र

नंदुरबार, २१ सप्टेंबर (वार्ता.) – शहरातील मिरवणुकीतील वाहनावर एक मुसलमान त्याच्या खांद्यावर एका लहान मुलाला घेऊन उभा राहिला, तसेच फुले यांच्या पुतळ्याच्या जवळ मिरवणूक पहाणार्‍या लोकांकडे पाहून त्याने पहेलवानी दंड थोपटत चिथावणी दिली. काही धर्मांधांनी औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे छापील फलक मिरवणुकीत झळकावले, तसेच हातात हिरवे झेंडे घेऊन ते फडकावले. त्यामुळे १९ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत शहरात मोठ्या प्रमाणात दंगल उसळली. सद्य:स्थितीत शांतता प्रस्थापित झाली असली, तरी पोलिसांकडून दंगलखोरांची धरपकड चालू आहे. ४ अल्पवयीन मुलांसह ५५ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस्. यांनी दिली आहे.

२७ वाहनांसह दुकाने आणि घरे जाळली !

नंदुरबार शहरातील महात्मा फुले पुतळाजवळील रहीम चौकी, ईलाही चौक, चिराग अली मशीद, भद्राचौक, बोडरा गल्ली, करीम मंजील, नवनाथ टेकडी, शादुर्लानगर, शाळा क्रमांक ९ आणि अन्य परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यात प्रामुख्याने पोलिसांना लक्ष्य करण्यात आले. पोलीस आणि वाहने यांच्यावर आक्रमण करतांना दंगलखोरांनी दगड-विटा, काचेच्या बाटल्या, धारदार हत्यारे यांचा सर्रास वापर केला. यात पोलीस घायाळ झाले.

पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे की, या आक्रमणात ६ शासकीय वाहने, २१ खासगी वाहने, तसेच काही दुकाने आणि घरे यांची जाळपोळ करून हानी करण्यात आली आहे.

दगडफेकीत २३ पोलीस घायाळ !

पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यांनी सांगितले की, दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत एकूण २३ पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड, अग्नीशमन दलाचे सैनिक यांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी अजून ५४ आरोपी आणि इतर २५० संशयित आरोपी पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धार्मिक स्थळाच्या विटंबनेसह खुनाचा प्रयत्न, लोकसेवकाला दुखापत, घातक हत्याराने मोठ्या प्रमाणात दुखापत करणे, अनधिकृत जमाव जमवून दंगा करणे, ज्वलनशील पदार्थाने आगळीक करणे, सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती, आक्रमणाच्या उद्देशाने गृह अतिक्रमण, भारतीय हत्यार कायदा कलम ४ चे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेची हानी, प्रतिबंधक कायदा कलम इत्यादी संदर्भातील कायदे कलमांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

सायबर सेलचे सामाजिक माध्यमांवर बारकाईने लक्ष !

‘नंदुरबार येथे झालेल्या घटनेविषयी कुणीही अफवा पसरवू नये, तसे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. नंदुबार जिल्हा पोलीस दल सायबर सेलद्वारे सामाजिक माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. शहरात शांतता प्रस्थापित होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे’, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस्. यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका :

  • धर्मांधांवर पोलिसांचा कुठलाच वचक नसल्यानेच ते वारंवार दंगली करून हिंदूंना आणि त्यांनाही लक्ष्य करतात !
  • हिंदूबहुल महाराष्ट्रात आतापर्यंत अनेकदा धर्मांधांनी दंगली घडवल्या; पण त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्यानेच वारंवार दंगली घडवण्याचे त्यांचे धाडस होते आणि प्रत्येक वेळी हिंदू अन् पोलीस मुकाटपणे मार खातात ! ही स्थिती कधी पालटणार ?
  • केवळ दंगलीचे कारण सांगणारे पोलीस काय कामाचे ? त्यापेक्षा कायदा-सुव्यवस्थेला न जुमानणार्‍या धर्मांधांवर जरब बसवण्यासाठी काय करणार, ते पोलिसांनी सांगावे !