Tirupati Laddu Row : हिंदु धर्मरक्षणासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ स्थापन करा !

  • आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची मागणी !

  • तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये चरबी मिसळल्याचे प्रकरण

आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण

अमरावती (आंध्रप्रदेश) – तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये माशांचे तेल, गोमांस आणि डुकर यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आल्यानंतर आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदु धर्मरक्षणासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ (मंडळ) स्थापन करण्याची मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री पवन कल्याण पुढे म्हणाले की,

१. तिरुपती बालाजीच्या प्रसादमध्ये प्राण्यांची चरबी (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस यांची चरबी) मिसळली जात असल्याने आम्ही सर्व जण फार हैराण झालो आहोत. तत्कालीन वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकारद्वारे स्थापन झालेल्या ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम् बोर्डा’ला अनेक प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतील. आमचे सरकार कठोर कारवाई करण्यासाठी वचनबद्ध आहे. ही घटना मंदिरांचे पावित्र्यभ्रष्ट, भूमीचे प्रश्‍न आणि इतर धार्मिक प्रथा, यांच्याशी संबंधित अनेक समस्यांवर प्रकाश टाकते.

२. आता भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व सूत्रांवर विचार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ स्थापन करण्याची वेळ आली आहे. याविषयी राष्ट्रीय पातळीवर सर्व धोरणकर्ते, धर्मप्रमुख, न्यायव्यवस्था, नागरिक, प्रसारमाध्यमे आणि आपापल्या क्षेत्रातील इतर सर्वांनी चर्चा केली पाहिजे. सनातन धर्माचा होणारा अपमान रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे.