संपादकीय : हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न !

प्रसिद्ध भागवत्कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज यांची १५ सप्टेंबर या दिवशी एका प्रसिद्ध वाहिनीवर मुलाखत घेण्यात आली आणि त्यांना विविध विषयांवरील प्रश्न विचारण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘‘येणारा काळ पुष्कळ कठीण आहे. येणार्‍या काळात हिंदूंना टिकून रहायचे असेल, तर मुलाला छत्रपती शिवाजी महाराज आणि मुलीला झाशीची राणी बनवायला हवे.’’ त्यावर निवेदकांनी ‘‘मग कायदे कशासाठी आहेत ?’’ असे विचारले. त्यावर ते म्हणाले, ‘‘बांगलादेशातही कायदे होते. तिथे काय झाले ?’’ त्यावरही उलटसुलट प्रश्न विचारायला आरंभ केल्यावर ते म्हणाले, ‘‘आपल्या देवतांच्या हातातही शस्त्र आहेत. श्रीकृष्णाला सतत बासरीच वाजवायची असती, तर त्याने सूदर्शनचक्र हातात घेतले नसते. हिंदूंना पळून जावे लागत आहे. काश्मीरमध्येही तेच झाले. तेथेही कायदे होते. पळून न जाता हिंदूंनी तिथेच राहून लढले पाहिजे. त्यासाठी शस्त्र हवे.’’

सध्या जग युद्धाच्या सावटाखाली आहे. अनेक भविष्यवेत्त्यांनी सांगितल्यानुसार इस्लाम आणि ख्रिस्ती पंथीय यांची आपापसांत युद्धे चालू आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जगातील युद्धजन्य स्थिती थांबवू शकणारे ‘मसिहा’ म्हणून पाहिले जात आहे; परंतु ज्या देशामुळे आणि ज्या देशातील सनातन हिंदु संस्कृतीमुळे ते पंतप्रधान आहेत, त्या देशात हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत आहे. ठिकठिकाणी जिहाद्यांनी विविध जिहाद चालू ठेवून एवढा उच्छाद मांडला आहे की, हिंदूंना जगणे कठीण झाले आहे. वक्फ बोर्डाने तर हिंदूंना पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवली आहे.

मागील वर्षी फेब्रुवारी मासात त्याच वाहिनीवर अनिरुद्धाचार्य महाराज यांना अशाच आशयाचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्या वेळीही त्यांनी स्पष्ट म्हटले, ‘‘बलात्कार होत असतांना स्त्रियांनी ते होऊ द्यायचे कि झाशीच्या राणीप्रमाणे तलवार घेऊन त्याचा प्रतिकार करायचा ?’’ हनुमान गढीचे महाराज संत राजीवदास यांनी एका प्रसंगाविषयी मागील वर्षी असेच विधान केले होते, ‘जो धडापासून शीर वेगळे करेल (सर तनसे जुदा) त्याला २१ लाख रुपये देण्यात येतील’ त्यांच्या या विधानाविषयी अनिरुद्धाचार्य महाराजांना ‘‘या संतांच्या विधानाविषयी काय वाटते ? मग कायदे कशासाठी आहेत ?’’ असा प्रश्न विचारण्यात आला. एकीकडे ज्यांनी खरोखर ‘सर तनसे जुदा’ नीती अवलंबून हिंदूंना त्राही त्राही करून सोडले आहे, त्यांना हा प्रश्न विचारण्याचे धैर्य वाहिनीच्या निवेदकांना नाही; इतकेच काय हिंदूंवर वारंवार आक्रमणे करणार्‍या घटनांचे साधे वृत्तांकनही या वाहिन्या करत नाहीत; मात्र हिंदूंच्या संतांनी हिंदूंचे जीव जात असतांना त्यांना जागृत करण्यासाठी काही विधान केले, तर त्यांना या वाहिन्या केवळ लक्ष्य करतात आणि त्याविषयी दुसर्‍या संतांची साक्ष काढायलाही मागे-पुढे पहात नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज यांनी ‘हिंदूंना आता त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी शस्त्राचा वापर करण्याची वेळ आली आहे’, हे उघडपणे सांगितले. अस्तित्वाचा प्रश्न उरला नसतांना हिंदूंनी काय करावे ? असे असले, तरी निधर्मी इकोसिस्टमचा अविभाज्य भाग असलेली प्रसारमाध्यमे मुसलमानांना हे प्रश्न विचारायला न धजावता हिंदूंच्या संताना विचारतात, हे लक्षात घेतले पाहिजे !

हिंदूंनी संघटित राहून आक्रमणाला योग्य ते प्रत्युत्तर न दिल्यास त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण हाईल !