बांगलादेशी घुसखोरांना आळा घालण्यासाठी शिंगणापूर (जिल्हा कोल्हापूर) ग्रामपंचायतीचा ठराव ! – रसिका पाटील, सरपंच, शिंगणापूर

काही लोकांनी सामाजिक माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने ठरावाचा प्रचार केल्याचे उघड

कोल्हापूर – ‘आमच्या शेजारच्या गावात मे महिन्यात २ बांगलादेशी महिला स्थानिक पत्यावर आधारकार्ड बनवून रहात असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शिंगणापूरच्या ग्रामसभेत चर्चा झाली. त्या अनुशंगाने बांगलादेशी घुसखोरांना आळा घालण्यासाठी शिंगणापूर (जिल्हा कोल्हापूर) ग्रामपंचायतीचा ठराव करण्यात आला. या ठरावात ‘बांगलादेशी घुसखोर आढळल्यास त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये’, असे नमूद केले होते. असे असतांना काही लोकांनी सामाजिक माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने ठरावाचा प्रचार केला. चुकीच्या पद्धतीने जो ठराव सगळीकडे प्रसारित झाला, त्याविषयी सरपंच म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते. कोणत्याही समाजाला न्यून लेखण्याचा आमचा हेतू नाही’, असे शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. (खरे पहाता आज बांगलादेशी घुसखोरांचा धोका हा अगदी गावपातळीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे त्या संदर्भात एखादी ग्रामपंचायत जर ठराव करत असेल, तर गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते योग्यच आहे ! या संदर्भात संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव करण्यामागील हेतू लक्षात घेणे आवश्यक आहे ! – संपादक)

१. करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या २८ ऑगस्ट २०२४ च्या सभेत करण्यात आलेल्या एका ठरावाचे पत्र १५ सप्टेंबरला  सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाले. ‘मौजै शिंगणापूर गावच्या सीमेतील नवीन मतदार नोंदणी करतेवेळी नवीन येणार्‍या अल्पसंख्यांक (मुसलमान) यांची नवीन मतदान नोंदणीत नावे समाविष्ट करण्यात येऊ नयेत’, असे सर्वानुमते ठरले. ज्या वेळी नवीन मतदारसूची प्रसिद्ध होईल, तेव्हा नवीन अल्पसंख्यांक (मुसलमान) यांची नोंद झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने हरकती घेऊन सदरची नावे अल्प करण्यात यावीत, असेही सर्वानुमते ठरले असून त्याच गावसभा सर्वानुमते संमती देत आहे.’ असे लिखाण सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या ठरावात होते.

२. या संदर्भात तेथील ग्रामसेवकांनी सांगितले की, सामाजिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली प्रत कुणालाही देण्यात आलेली नाही. ठरावाची नक्कल सिद्ध झाल्यावर आणि त्यावर स्वाक्षरी केल्यावर त्यातील चूक लक्षात आल्यावर ती कार्यालयात ठेवण्यात आली.

३. हे पत्र प्रसारित झाल्यावर या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश जिल्हा परिषद स्तरावर गटविकास अधिकारी आणि करवीर तहसीलदार यांनी दिला आहे.

४. या संदर्भात ‘मोहोमेडन एज्युकेश सोसायटी’ने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. यामध्ये ‘ग्रामपंचायत शिंगणापूरचे सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य यांनी मुसलमान मतदान नोंदणी न करणे याविषयी केलेला ठराव घटनाबाह्य आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा आहे. त्यामुळे सर्व संबंधितांवर फौजदारी नोंद करावी आणि ग्रामपंचायत विसर्जित करावी’, अशी मागणी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना वेळीच शोधून त्यांच्यावर कारवाई केली असती, तर  गावकर्‍यांना असा ठराव करावा लागला नसता ! बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येला उत्तरदायी असलेल्या पोलिसांवर प्रथम कारवाई झाली पाहिजे !