सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणे साधकांप्रती अपार प्रीती असणारे आणि साधकांचे त्रास दूर करणारे सद्गुरु गाडगीळकाका !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांच्यात त्रासाशी लढण्याची ऊर्जा निर्माण करणे

‘पूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांच्या आध्यात्मिक त्रासांवर स्वतः उपाय सांगायचे. अनिष्ट शक्ती साधकांच्या शारीरिक वेदना, तसेच मनातील विचार वाढवून साधकांना पुष्कळ त्रास द्यायच्या; पण गुरुमाऊलींनी सांगितलेले उपाय करून साधक त्यांवर मात करायचे. गुरुदेवांनी साधकांमध्ये अनिष्ट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी ऊर्जा निर्माण केली. त्यामुळे साधक न थकता आणि न हरता त्रासांशी अनेक वर्षे लढत आहेत.

२. साधकांप्रती अपार प्रीती असणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ म्हणजे प्रतिगुरुमाऊलीच !

सौ. अंजली जोशी

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या माध्यमातून आम्हा साधकांना प्रतिगुरुमाऊली दिली. सद्गुरु काकांच्या माध्यमातून साधक गुरुदेवांसारखीच अपार प्रीती अनुभवत आहेत. सद्गुरु काका साधकांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय सांगतात. साधकांनी त्यांना अर्ध्या रात्रीही उपाय विचारले, तरी ते नामजपादी उपाय शोधून देतात. ते स्वतःचा विचार करत नाहीत. गुरुदेवांप्रमाणेच त्यांचेही मन साधकांप्रतीच्या प्रीतीने ओथंबलेले आहे.

३. ‘औषधाच्या गोळ्या घेईपर्यंत सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांचा परिणाम चालू होतो आणि त्या नामजपाने ती व्याधी समूळ दूर होते’, असे अनुभवायला मिळते.

४. सद्गुरु गाडगीळ यांचे शरीर म्हणजे वेगवेगळ्या नामजपांचा खजिनाच !

‘सद्गुरु काकांचे शरीर म्हणजे वेगवेगळ्या नामजपांचा खजिना आहे. त्यांच्या शरिरातील सप्तचक्रे, म्हणजे उपायांच्या नामजपाची एक एक पेटी आहे. साधकांच्या त्रासांनुसार ते त्या त्या चक्रावरील पेटीतून उपायांचा नामजप काढतात आणि साधकांना सांगतात’, असे मला वाटते.’

– सौ. अंजली अजय जोशी (वय ६१ वर्षे), फोंडा, गोवा. (२१.८.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.