हिंदु संघटित झाले, तर राष्ट्र सुरक्षित राहील ! – गौतम रावरिया, सहसंयोजक, कोकण प्रांत, बजरंग दल

हिंदु संमेलनाच्या वेळी व्यासपिठावर उपस्थित गौतम रावरिया (उजवीकडून दुसरे) आणि अन्य मान्यवर

नवी मुंबई – आपण जागृत होऊन संघटित झालो, तरच आपले राष्ट्र सुरक्षित राहील, असे प्रतिपादन बजरंग दलाचे कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरिया यांनी येथे केले. विश्व हिंदु परिषदेच्या षष्ठीपूर्ती निमित्ताने विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरखैरणे येथे हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या संमेलनाला श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर महास्वामी शिवरुद्रानंद महाराज यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी त्यांनी उपस्थित तरुणांना हिंदु धर्मकार्याशी जोडण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला ह.भ.प. दशरथ महाराज सावंत, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक तेजस पाटील, ह.भ.प. पंडित महाराज वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

गौतम रावरिया म्हणाले की, विश्व हिंदु परिषद जात-पात, संप्रदाय, प्रदेश, गरीब-श्रीमंत असा भेदभाव मानत नाही. सर्व हिंदु एक आहेत. ‘हसके लिये पाकिस्तान घुस के लेंगे हिंदुस्थान’ ही जिहाद्यांची घोषणा सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या देशात गेल्या ७० वर्षांमध्ये १० कोटींहून अधिक रोहिंग्या बंगलादेशी घुसले आहेत आणि आपण निद्रिस्त आहोत. यांच्यामुळे आपल्या देशाची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. असेच आपल्या रोजगारावरही घाला आला आहे. राष्ट्र टिकले, तर समाज आणि धर्म टिकू शकेल, यासाठी बजरंग दल कार्यरत आहे. सेवा, सुरक्षा, संस्कार हे बजरंग दलाचे काम आहे. प्रत्येकाने २४ घंट्यांपैकी २ घंटे देव, देश आणि धर्म यांसाठी देण्याची वेळ आली आहे. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या माध्यमातून ७ लाख घरवापसी केली, तसेच ७ सहस्र मुली ‘लव्ह जिहाद’मुक्त केल्या आहेत.

विश्व हिंदु परिषदेच्या मनीषाताई भोईर, ह.भ.प. सुरेश महाराज जाधव, इस्कॉनचे अद्वैत चैतन्यदास यांचे मार्गदर्शन या वेळी झाले.