साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणारे आणि स्वतःच्या आचरणातून साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

मुंबई येथील सेवाकेंद्रात मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. मला त्यांच्यातील गुणांचे दर्शन आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे. २ सप्टेंबर या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/830644.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२ इ. गुरुदेवांच्या सत्संगात आनंद होणे 

२ इ १. ‘गुरुदेव भेटणार !’, या विचाराने आनंद होणे : वर्ष २००५ मध्ये गुरुदेव गोवा येथून मुंबईला येत असत. तेव्हा त्यांना ‘चारचाकी गाडीने विमानतळावरून आणणे, त्यांना मुंबई येथे नियोजित ठिकाणी घेऊन जाणे आणि पुन्हा विमानतळावर पोचवणे’, या सेवा माझ्याकडे होत्या. गुरुदेव येण्याच्या आदल्या रात्री ‘उद्या गुरुदेव मला भेटणार !’, या विचाराने मी आनंदी होत असे आणि मला झोप येत नसे. तेव्हा मला गुरुदेवांशी संबंधित प्रसंग आठवून आनंद होत असे. मला गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन आठवत असे. गुरुदेवांनी एका मार्गदर्शनात सांगितले, ‘‘संत सहवासात असतांना सुगंध येणे, नामजप आपोआप चालू होणे’, असे अनुभवता येते का ? किंवा त्यांच्याकडून काही शिकायला मिळते का ?’, याकडे साधकांनी लक्ष द्यावे. ‘गुरूंनी मौनातून शिकवले आणि शिष्य मौनातून शिकला’, असे होते का ?’, ते साधकांनी पहावे.’’

२ इ २. ‘ज्यांना प्रार्थना करतो, त्या गुरुदेवांना भेटत आहे’, असे न जाणवता ‘जिवाभावाच्या व्यक्तीला भेटत आहे’, असे वाटून आनंद होणे : एकदा ‘त्यांच्या भेटीच्या वेळी मला त्यांच्या सहवासाचा लाभ होण्याकडे लक्ष देऊया’, असे ध्येय घेऊन मी त्यांची विमानतळावर वाट पहात होतो. ‘आम्हा दोघांचे एकमेकांकडे लक्ष जावे’, यासाठी आम्ही एकमेकांना हात दाखवत असतांना मला त्यांना पहाताच पुष्कळ आनंद होत असे. त्या वेळी मला इतका आनंद होत असे की, ‘मी ज्यांना प्रार्थना करतो, ते माझे गुरुदेव मला भेटत आहेत’, हे विसरून ‘मी माझ्या जिवाभावाच्या व्यक्तीला भेटत आहे’, असे मला त्या क्षणी वाटत असे.’

२ ई. ‘गुरुदेवांकडून मौनातून शिकायचे’, असे ठरवणे   

श्री. सागर म्हात्रे

२ ई १. साधकाने ‘गुरुदेवांकडून मौनातून शिकायचे’, असे ठरवणे आणि साधक वाहन चालवत असतांना गुरुदेवांनी त्याला वाहनांशी संबंधित प्रश्न विचारणे अन् साधकाने त्यांची उत्तरे देणे : एकदा मी चारचाकी गाडीने गुरुदेवांना विमानतळावरून आणायला गेलो होतो. तेव्हा मी ठरवले, ‘गुरुदेवांकडून मौनातून शिकायचे.’ गुरुदेव मला प्रवासात प्रश्न विचारत होते, ‘‘लहान वाहन आणि मोठे वाहन यांच्यात काय भेद असतो ? त्यांना किती पेट्रोल लागते ? कोणते वाहन सोयीचे असते ? इत्यादी.’’ तेव्हा ‘माझे मौन आहे’, हे मी विसरलो आणि मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

२ ई २. ‘गुरुदेवांनी साधकाला सांगितलेले सर्व शब्द आणि वाक्ये साधकाच्या भोवती सोनेरी अक्षरांत वलय करून चिकटलेली आहेत’, असे साधकाला दिसणे आणि गुरुदेवांनी ‘साधकाने घेतलेले ध्येय साध्य झाले’, असे सांगणे : गुरुदेवांना दुसर्‍या दिवशी इंदूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विमानाने जायचे होते. तेव्हा मी मनाचा आढावा घेतल्यावर माझ्या लक्षात आले, ‘मला काहीच अनुभवता आले नाही. मी गुरुदेवांच्या सत्संगाचा लाभ करून घेतला नव्हता.’ नंतर गुरुदेव इंदूरहून मुंबईला परत आले. ते गोवा येथे जाणार होते. तेव्हा त्यांना मुंबई येथील विमानतळावर पोचवायचे होते. त्यांना विमानतळावर घेऊन जाण्याची वेळ आली, तरीही माझे ध्येय पूर्ण होत नव्हते. ‘मी त्यांच्या सत्संगाचा लाभ करून घेतला नाही’, या विचाराने मला रडू येत होते.

गुरुदेव चारचाकी गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘गुरुदेव मुंबईला आल्यापासून माझ्याशी बोलतांना त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द आणि वाक्ये माझ्या भोवती सोनेरी वलयात फिरत आहेत.’ याविषयी मी गुरुदेवांना सांगितले. तेव्हा ते मला आनंदाने म्हणाले, ‘‘तुझे ध्येय साध्य झाले.’’

भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/831502.html

– श्री. सागर म्हात्रे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.३.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक