ईश्वरपूर येथे ब्राह्मणसभा संघाच्या वतीने पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे यांचा सन्मान !

ईश्वरपूर येथे ७ जुलै २०२३ या दिवशी झालेल्या एका भावसोहळ्यात सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी श्रीरामाचा अखंड नामजप करून त्याद्वारे इतरांना नामजपाची गोडी लावून चिकाटीने व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्‍या श्रीमती वैशाली सुरेश मुंगळे यांना संत म्हणून घोषित केले होते.

सन्मान चिन्हासमवेत पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे

ईश्वरपूर (जिल्हा सांगली), १ सप्टेंबर (वार्ता.) – ब्राह्मण सभा ईश्वरपूर आणि वाळवा तालुका ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ऑगस्ट या दिवशी ‘विद्यार्थी गुणगौरव आणि कौतुक समारंभ’ येथे पार पडला. या सोहळ्यात सनातन संस्थेच्या वतीने ‘संतपद’ घोषित केल्याविषयी कृषी धोरण शास्त्रज्ञ डॉ. शशांक कुलकर्णी यांच्या हस्ते येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे (वय ७७ वर्षे) यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय जी.एस्.टी. विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर होते.

कृषी धोरण शास्त्रज्ञ डॉ. शशांक कुलकर्णी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी भविष्याचे नियोजन करतांना पैशाला केंद्रस्थानी न मानता आपल्या ध्येयाला महत्त्व देणे आवश्यक आहे. राजेंद्र मेढेकर  म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटीने वाटचाल करून ध्येय समोर ठेवून स्पर्धा परीक्षांना सामोरे गेल्यास यश निश्चित मिळते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव उरुणकर यांनी स्वागत केले. या वेळी विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी, मान्यवर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास प्राचार्य महेश जोशी, शहराध्यक्ष संदीप कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अवधूत कुलकर्णी, अरुण बिळासकर, प्रा. निरंजन जरंडीकर, डी.एन्. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.