सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील साधकांनी अनुभवलेली भावस्थिती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. कु. काव्यांश जुनघरे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८ वर्षे), खांदा कॉलनी, पनवेल.

अ. ‘आम्ही ब्रह्मोत्सवाला जाण्यापूर्वी २ – ३ दिवस आधीपासून माझे गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) अनुसंधान साधले जात होते.

आ. माझ्याकडून आपोआप गुरुदेवांची मानसपूजा होत होती.

इ. मला गुरुदेवांची आठवण येत होती.

ई. ‘गुरुदेवांचे दर्शन होणार’, यासाठी मला आनंद होत होता.’

२. सौ. अनघा दीपक मयेकर, कामोठे, नवी मुंबई.

अ. ‘ब्रह्मोत्सवाच्या आदल्या रात्री आम्ही ओरोस येथे सौ. मिसाळ यांच्या घरी थांबलो होतो. त्या रात्री मला स्वप्नात आकाशात एक रथ दिसला. त्याला हरणे जोडलेली होती; मात्र ‘रथात कोण बसले आहे’, ते मला दिसले नाही. मी स्वप्नातच साधिकांना बोलावून तो रथ दाखवला.

आ. दुसर्‍या दिवशी रथारूढ प.पू. गुरुमाऊलींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन झाल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली.’

३. कु. अपर्णा हेंडगे, खांदा कॉलनी, पनवेल

अ. ‘मी कार्यक्रमस्थळी पोचल्यावर माझ्या मनातील चलबिचल दूर होऊन माझा आपोआप नामजप चालू झाला.

आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाल्यावर मला कसलेच भान राहिले नाही. मी मनात केवळ ‘गुरुदेवा, कृतज्ञता’ एवढेच म्हणत होते. मला तीनही गुरूंच्या भोवती पांढर्‍या रंगाची प्रभावळ दिसत होती.

इ. श्री. विनायक शानबाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) बोलत असतांना त्यांच्या आवाजातील ‘गुरुदेव’ या शब्दातील आर्तता मला खोलवर जाणवत होती आणि माझ्याकडून सतत ‘जय गुरुदेव’ अशा घोषणा मनातून दिल्या जात होत्या.

ई. ‘रथ भूमीवर चालत नसून अधांतरी हवेत आहे’, असे मला वाटले.

उ. ‘गुरुदेव करत असलेल्या नमस्काराच्या मुद्रेतून चैतन्य आणि प्रीती यांचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला वाटत होते.

ऊ. काही साधक आणि संत अनुभूती सांगत असतांना त्यांची प.पू. गुरुदेवांच्या चरणी असलेली श्रद्धा, भक्ती आणि समर्पणभाव पाहून ‘मलाही असे प्रयत्न करायला हवेत’, याची प्रकर्षाने जाणीव झाली. मी गुरुदेवांच्या चरणी तशी प्रार्थना केली. माझा सतत भाव जागृत होत होता.’

ए. गुरुदेवांचे कार्यक्रमस्थळाहून प्रस्थान होत असतांना साधक जयघोष करत होते. तेव्हा संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते.

ऐ. दैवी रथाचे दर्शन घेतांना ‘ही हिंदु राष्ट्राची नांदी आहे’, असे वाटून माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले.’

(लेखातील सर्व सूत्रांचा मास : जून २०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक