रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकवृद्धी’ शिबिराच्या वेळी शिबिरार्थींना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. श्री. सहयोग नितीन वाणी, जळगाव

१ अ. आश्रमात पोचल्यावर चक्कर येणे बंद होणे : ‘मी जेव्हा गोवा येथील रेल्वेस्थानकावर उतरलो, तेव्हा मला चक्कर येऊ लागली. रामनाथी आश्रमात पोचल्यावर मला चक्कर येणे बंद झाले. आश्रमातील चैतन्यामुळे माझे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास दूर झाले.’

२. कु. विशाखा शिंदे, ओझर, जिल्हा नाशिक

२ अ. आश्रमातील प्रत्येक वस्तू नामस्मरण करत असल्याचे जाणवणे आणि वस्तूंना हात लावल्यावर चैतन्य मिळणे : ‘रामनाथी आश्रमातील प्रत्येक वस्तू नामस्मरण करत आहे’, असे मला जाणवले. ‘आश्रमातील कोणत्याही वस्तूला हात लागला की, माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे आवरण आपोआप नष्ट होत आहे’, असे मला जाणवले. मला एरव्ही डोकेदुखीचा त्रास होतो; पण आश्रमात आल्यापासून मला तो त्रास जाणवला नाही.

२ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले.

२ इ. दैवी गंध येणे आणि ‘तो गंध सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळे येत आहे’, असे जाणवणे : शिबिरात ‘संगीताच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’, हा विषय शिकत असतांना मला दैवी गंध आला. आजूबाजूला बसलेले सर्व साधक अत्तर आणि कापूर यांचे उपाय करत होते; पण मला अत्तर किंवा कापूर यांचा गंध न येता दैवी गंध येत होता. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले येथे प्रत्यक्ष आहेत आणि त्यांच्या अस्तित्वामुळे हा दैवी गंध येत आहे’, असे मला जाणवले. मी ‘गुरुदेव’, असे म्हणताच गंधाची तीव्रता वाढली. ‘जणू गुरुदेवांनी माझ्या हाकेला ‘ओ’ दिली’, असे मला जाणवले.’

३. सौ. दीपाली वसंत मंडलिक, ओझर, नाशिक

३ अ. साधिकेला शिबिरासाठी गोवा येथे बोलावण्याच्या संदर्भात तिच्या यजमानांना मिळालेली पूर्वसूचना ! : ‘२६.१.२०२४ या दिवशी माझे यजमान मला म्हणाले, ‘‘तुला गोवा येथील शिबिराला बोलावतील का ?’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘असे लगेच बोलावणार नाहीत; कारण माझी तेवढी साधना नाही.’’ त्यानंतर ८ – १० दिवसांनी मला आमच्या उत्तरदायी साधिकेने भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘तुमची रामनाथी (गोवा) येथे होणार्‍या शिबिरासाठी निवड झाली आहे.’’ त्यानंतर मी यजमानांची अनुमती घेऊन शिबिरासाठी गोवा येथे आले.’

३ आ. मी रामनाथी आश्रमात आले. तेव्हा येथील स्वच्छता आणि साधकांमधील शिस्त पाहून मला श्री सत्यसाईबाबा यांच्या पुट्टपर्ती (आंध्रप्रदेश) येथील आश्रमात आल्यासारखे वाटले.’

४. श्री. जय चव्हाण, जळगाव

अ. ‘मी जळगाव येथून प्रवास करून गोवा येथे आलो होतो. त्यामुळे मला अस्वस्थ वाटत होते; पण आश्रमातील साधकांच्या चेहर्‍यावरील प्रसन्नता पाहून माझी अस्वस्थता दूर झाली.

आ. आश्रमातील साधकांचा शिबिरार्थींप्रती असलेला भाव, शिस्त आणि प्रेम पाहून पुष्कळ छान वाटले.’

५. श्री. प्रमोद माळी, खर्ची (बु.), एरंडोल, जिल्हा जळगाव

अ. ‘आश्रमात आल्यापासून माझे मन प्रसन्न झाले. ‘मी स्वर्गात आलो आहे’, असे मला वाटले.

आ. ‘आश्रमातील साधकांचे प्रेमाने बोलणे आणि हसरे चेहरे बघून साक्षात् देवी-देवतांचे दर्शन झाले’, असे मला वाटले.’

६. श्री. साईराम देवनपेल्ली, जिल्हा अहिल्यानगर

अ. ‘आश्रमातील महाप्रसादामध्ये पुष्कळ सात्त्विकता आहे. येथील चैतन्यामुळे मी मला न आवडणारे पदार्थही खाऊ शकलो.’

७. श्री. हर्षद फुलारी, भानसहिवरे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर.

७ अ. शिबिरासाठी गोवा येथे जाण्यासाठी पैसे नसणे; परंतु मित्राने उसने घेतलेले पैसे परत दिल्याने प्रवासाची सोय होणे : ‘मला शिबिरासाठी गोवा येथे जायचे होते. तेव्हा माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. तेव्हा माझी विचारपूस करण्यासाठी मला माझ्या एका मित्राचा भ्रमणभाष आला. मी त्याच्याकडे पूर्वी उसने दिलेले पैसे मागितले. त्याने माझे पैसे त्वरित परत केले आणि माझी गोवा येथे जाण्याची सोय झाली. यापूर्वीही मला अशीच अनुभूती आली होती.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १५.२.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक