Nitin Gadkari On Road Accidents : देशात युद्ध, आतंकवाद आणि नक्षलवाद यांपेक्षा रस्‍ते अपघातात अधिक लोकांचा होतो मृत्‍यू !

  • केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती

  • चालकांना बनवले जाते बळीचा बकरा ! – गडकरी यांचा दावा

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी

नवी देहली – भारतामध्‍ये युद्ध, तसेच आतंकवादी आणि नक्षलवादी आक्रमणे यांच्‍यात मरणार्‍यांच्‍या संख्‍येपेक्षा रस्‍ते अपघातात अधिक लोकांचा जीव गेला आहे, अशी माहिती केंद्रीय रस्‍ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना दिली.

गडकरी म्‍हणाले की,

१. भारतात प्रतिवर्षी ५ लाख अपघात होतात आणि दीड लाख लोकांचा मृत्‍यू होतो, तर सुमारे ३ लाख लोक घायाळ होतात. त्‍यामुळे देशाच्‍या सकल राष्‍ट्रीय उत्‍पादनाला (जीडीपीला) ३ टक्‍क्‍यांनी फटका बसला आहे.

२. बळीच्‍या बकर्‍याप्रमाणे प्रत्‍येक अपघातासाठी चालकाला उत्तरदायी धरले जाते. मी तुम्‍हाला सांगतो आणि मी बारकाईने निरीक्षण देखील करतो की, रस्‍ता अभियांत्रिकीमध्‍ये अनेकदा चुका होतात. सर्व महामार्गांचे सुरक्षा परीक्षण करण्‍याची आवश्‍यकता आहे.

३.  रस्‍ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय रुग्‍णवाहिका आणि त्‍यांचे चालक यांच्‍यासाठी नियम बनवत आहे, जेणेकरून रस्‍ता अपघातग्रस्‍तांना त्‍वरित वाचवण्‍यासाठी ‘कटर’सारख्‍या यंत्रसामग्रीचा वापर करण्‍याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते.

संपादकीय भूमिका

भारतियांना वाहन चालवण्‍याची, रस्‍त्‍यांवरून चालवण्‍याची आणि नियमांचे पालन करण्‍याची शिस्‍त नसल्‍यानेच अपघात होतात. आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला यासंदर्भात शिस्‍त न लावणे, हाच सर्वांत मोठा गुन्‍हा आहे !