सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानंतर सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेला भावजागृतीचा प्रयोग !

‘२२.५.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव सोहळा झाला. त्यानंतर २३.५.२०२२ या दिवशी माझा भाव जागृत होत होता. तेव्हा ‘सृष्टी कशी नटली होती ?’, असा भावजागृतीचा प्रयोग मला गुरुदेवांच्या कृपेमुळे अनुभवता आला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. रथोत्सवात सहभागी झालेले सृष्टीतील घटक 

१ अ. मुंग्या

१. ‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवात सहभागी व्हायला हवे’, असा विचार मुंग्यांच्या मनात आला.

२. मुंग्यांनी जन्मोत्सवासाठी सिद्धता केली. त्यांनी नृत्यासाठी त्यांचे विविध गट सिद्ध केले. त्यांनी रांगेत चालणार्‍या मुंग्या आणि जयघोष करणार्‍या मुंग्या, असे गट केले.

३. त्यांनी ठरवले, ‘जन्मोत्सवात तन आणि मन अर्पण करून सहभागी व्हायचे. जन्मोत्सवात सहभागी झाल्यावर मृत्यूला सामोरे जावे लागले, तरी चालेल; पण सोहळ्याला जाऊन त्याचा आनंद घ्यायचा.’

४. जन्मोत्सवाच्या दिवशी मुंग्यांनी सौंदर्यप्रसाधन म्हणून रामनाथी आश्रमातील धूळ चेहर्‍याला लावली. लाल माती कुंकू म्हणून लावली, तर बारीक रेतीच्या कणांचे घुंगरू करून पायांत घातले.

१ आ. खारुताई : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा रथ ज्या मार्गाने जाणार होता, तो मार्ग खारुताईने स्वच्छ केला.

१ इ. पक्षी : पक्ष्यांनी संगीताची बाजू सांभाळली.

१ ई. वृक्षवेली : वृक्षवेली वायूदेवतेच्या साहाय्याने टाळ्या वाजवत आणि डोलत ‘नारायण हरि, नारायण हरि’ असे म्हणत होत्या.

१ उ. मोर : त्या वेळी मोर पिसारा फुलवून नाचत होता.

१ ऊ. हत्ती : हत्ती श्रीमन्नारायणाला वंदन करून कमलपुष्प अर्पण करत होता.

१ ए. अश्व : अश्वांना ‘आज नारायणाची सेवा करायला मिळणार’, याचा आनंद झाला होता. ते आनंदात आणि नम्रभावात होते.

१ ऐ. वानर : वानरांनी वेगवेगळ्या प्रकारची रसरशीत फळे आणली आणि गुरुदेवांच्या चरणी अर्पण केली. त्यांनी ‘जय श्रीराम, जय श्रीराम’, अशा घोषणा दिल्या. त्यांनी ‘आम्हाला हिंदु राष्ट्रात घ्या’, अशी गुरुदेवांना प्रार्थना केली.

१ ओ. सूर्यनारायण : सूर्यनारायण काही काळ थांबून श्रीमन्नारायणाचा भावसोहळा पहात राहिले. त्यांना श्रीमन्नारायणाचा भावसोहळा पहातांना धन्यता वाटत होती.

२. रथोत्सवात सहभागी झालेल्या घटकांना गुरुदेवांच्या कृपेने ‘अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग’, अशी अनुभूती येणे

सौ. निवेदिता जोशी

या सोहळ्यात अवघी सृष्टी न्हाऊन निघाली होती. त्या वेळी मला वाटले, ‘सृष्टी आणि साधक एकरूप झाले आहेत.’ तेव्हा गुरुदेवांचा रथोत्सव आणि त्यातील आनंद अनुभवणे, एवढेच सर्वांच्याच मनात होते. त्या वेळी सर्वांच्या मनातील आनंद ओसंडून वहात असतांना गुरुदेवांनी ‘अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग’, अशी सर्वांना अनुभूती दिली.

गुरुदेवा, या सोहळ्यासाठी तुमच्या प्रती कितीही वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे. मी तुमच्या चरणी अनन्यभावाने भावसुमनांजली अर्पण करते.’

– सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५२ वर्षे), नंदुरबार. (२८.५.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक