Bangladesh Crisis : भारताने शेख हसीना यांना आश्रय देण्‍यावरून बांगलादेशाने विरोध करणे स्‍वाभाविक ! – बांगलादेश नॅशनल पार्टी

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना

ढाका (बांगलादेश) – जर मला तुम्‍ही आवडत नाही आणि कुणीतरी दुसरी व्‍यक्‍ती तुम्‍हाला साहाय्‍य करत असेल, तर मला साहजिकच ती व्‍यक्‍तीही आवडणार नाही. त्‍यामुळे बांगलादेशामधील शेख हसीना यांना भारताने दिलेल्‍या आश्रयावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त होणे स्‍वाभाविक आहेत, असे विधान बांगलादेश नॅशनल पार्टीचे (बी.एन्.पी.चे) ज्‍येष्‍ठ नेते मुशर्रफ हुसेन यांनी केले आहे. त्‍याच वेळी त्‍यांनी ‘दुसर्‍या बाजूला भारत आणि बांगलादेश यांमध्‍ये नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत. मग ते शेख हसीना यांचे सरकार असो कि आणखी कुणीचे सरकार असो’, असेही स्‍पष्‍ट केले आहे. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्‍यानंतर भारतात तात्‍पुरता आश्रय घेतला आहे.

१. मुशर्रफ हुसेन पुढे म्‍हणाले की, भारताशी चांगले संबंध ठेवणे, हे बांगलादेशाच्‍या हितासाठी महत्त्वाचे आहे. जर भारताऐवजी दुसरा कुठला देश असता, तर मी हे म्‍हणालो नसतो; पण भारत एक मोठा देश आहे आणि जगातली एक मोठी अर्थव्‍यवस्‍था आहे. चांगल्‍या द्वीपक्षीय संबंधांसाठी दोन्‍ही देशांनी एकत्र बसून या सूत्रांवर तोडगा काढायला हवा.

२. बी.एन्.पी.चे प्रवक्‍ते अमिर खसरू मेहमूद चौधरी यांनीही यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली आहे. ते म्‍हणाले की, आताच्‍या घडीला शेख हसीना या बांगलादेशामधील पसार व्‍यक्‍ती आहेत. अनेक गुन्‍ह्यांसाठी त्‍यांची चौकशी होणे आवश्‍यक आहे. यांत हत्‍या, लाखो रुपयांचा भ्रष्‍टाचार अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. त्‍यामुळे बांगलादेशाच्‍या नागरिकांना असे वाटते की, भारत सरकारने त्‍यांच्‍या भावनांचा विचार करावा. शेवटी २ देशांमधील संबंध म्‍हणजे तिथल्‍या नागरिकांमधले संबंध असतात.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी बांगलादेश नॅशनल पार्टी गप्‍प का आहे ? त्‍याने याविषयही बोलले पाहिजे !