जिवंतिका पूजन

आजपासून श्रावण मास चालू झाला आहे. त्‍या निमित्ताने…

श्रावण मास चालू झाला आहे. शहरांमध्‍ये बहुतांश घरांमध्‍ये जिवती पूजन बंद झालेले दिसते. अनेकांना माहितीही नाही की, जिवती पूजन काय असते ? जरा-जिवंतिका पूजन (जिवती) प्रतिमेचे पूजन आणि त्‍याचा अर्थ काय ? कोण ही जिवती ? पूजनाचा हेतू काय ? हे जाणून घेऊया.

जिवंतिका पूजनाचे संग्रहित छायाचित्र

आषाढ अमावास्‍येला दीपपूजन केले जाते. याच दिवशी जरा-जिवंतिका पूजनसुद्धा करतात. दिवा हे ज्ञान आणि वृद्धिंगत यांचे प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणार्‍या मार्गाचा मुख्‍य आधार आहे दीप ! तुम्‍ही एक दिवा उजळा, त्‍यावरून तुम्‍ही सहस्रो दिवे उजळू शकता. त्‍यामुळेच याला वंश वृद्धीचे प्रतीक मानतात. या प्रतिकाचे पूजन म्‍हणजेच दीपपूजन !

दुसरी पूज्‍य देवता म्‍हणजे जिवती ! जिवतीची प्रतिमेच्‍या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण मास या प्रतिमेचे मातृशक्‍तीकडून पूजन केले जाते आणि आपल्‍या अपत्‍यांच्‍या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत ४ वेगवेगळ्‍या देवतांच्‍या, वरवर पहाता परस्‍परांशी संबंध नसलेल्‍या स्‍वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्‍ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा पालटलेली दिसत नाही. काय रहस्‍य असेल या प्रतिमेतील देवतांच्‍या क्रमाचे ?

जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्‍ण, मध्‍यभागी मुलांना खेळवणार्‍या जरा-जिवंतिका आणि सगळ्‍यात खाली बुध-बृहस्‍पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्‍यांना पूजले जाते.

१. प्रथम भगवान नरसिंहच का ?

भगवान विष्‍णूचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्‍या बाळ भक्‍तासाठी प्रकट झाले. ही कथा आपल्‍या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्‍हादचे हिरण्‍यकश्‍यपूपासून म्‍हणजेच दैत्‍यांपासून रक्षण करणे, याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्‍तासाठी अवतार धारण केलेली देवता म्‍हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात.

याचाच अर्थ नरसिंह घरात ओढवणार्‍या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात, जसे उंचावरून पडणे, अन्‍नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्‍यादी.

२. नंतर कालियामर्दन करणारा श्रीकृष्‍ण !

यातील नाग आणि गोपाळकृष्‍ण हे दोन्‍हीही श्रावणातील आराध्‍यदैवत ! मग नाग आणि कृष्‍ण प्रतिमा वेगवेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्‍णच का ? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला, तर लक्षात येईल की, या प्रसंगात कृष्‍ण आणि त्‍याचे मित्र खेळत असतांना त्‍यांचा चेंडू यमुनेच्‍या डोहात गेला अन् कृष्‍णाने तो परत आणला. खेळणार्‍या, बागडणार्‍या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्‍णाने दूर केला, तसेच कालियाला न मारता त्‍यालाही अभय देऊन दूर जाण्‍याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणार्‍या प्राण्‍यांमध्‍ये मुख्‍य. सरपटणार्‍या प्राण्‍यांपासून वाचवणारा, तसेच महत्त्वाच्‍या प्राण्‍यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्‍या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्‍ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो.

म्‍हणजेच कालियादमन करणारा कृष्‍ण बाहेरच्‍या आपत्तींपासून जसे खेळतांना येणार्‍या आपत्ती, पाण्‍यापासूनचे संकट, सरपटणार्‍या प्राण्‍यांचे भय इत्‍यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणार्‍या संकटांपासून हे दोन्‍ही देव बालकांचे रक्षण करतात; म्‍हणून जिवती प्रतिमेत त्‍यांचे प्रथम स्‍थान आहे.

३. जरा आणि जिवंतिका !

नंतर येतात त्‍या जरा आणि जिवंतिका ! जरा आणि जिवंतिका या यक्ष गणातील देवता आहेत. जरा या यक्षिणीविषयी महाभारतात एक कथा येते. मगध नरेश बृहदरथ याला २ राण्‍या असतात. दोन्‍हीही राण्‍यांवर त्‍याचे सारखेच प्रेम असते; परंतु राजाला पुत्र/पुत्री काहीही नसल्‍यामुळे राजा चिंतित असतो. याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषि चंडकौशिक आल्‍याचे राजाला समजते. राजा त्‍यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो. ऋषि राजाला प्रसादात आंबा देतात आणि ‘राणीला खायला द्या’ म्‍हणून सांगतात. दोन्‍ही राण्‍यांवर समान प्रेम असल्‍यामुळे राजा आंब्‍याचे समान भाग करून राण्‍यांना देतो. कालांतराने दोन्‍ही राण्‍यांना पुत्र होतो; परंतु केवळ अर्धा-अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्‍याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्‍ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्‍या अवयव सांधण्‍याच्‍या कलेने दोन्‍ही शकले सांधते. जरा ते सांधलेले अर्भक संध्‍याकाळच्‍या वेळी बृहदरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने शरीर सांधले (एकत्र केले); म्‍हणून राजा त्‍या अर्भकाचे नाव ‘जरासंध’ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्‍या उपकाराप्रीत्‍यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्‍या इष्‍टदेवतेचा मान देतो. त्‍याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्‍सव चालू करतो, अशी ही जरा देवी ! जरा देवीचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्‍दाचा अपभ्रंश जिवती ! जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायु प्रदान करणारी. बालकाच्‍या दीर्घायुष्‍याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्‍यात आणि पाळण्‍याच्‍या आजूबाजूूला बालकांना खेळवत आहे, अशा रूपात चित्रात दाखवतात.

४. प्रतिमेत सगळ्‍यात शेवटी असणारे बुध आणि बृहस्‍पती (गुरु) !

बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्‍पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्‍या प्रभावाने जातकाला (बाळाला) अलौकिक बुद्धीमत्ता, आकर्षक व्‍यक्‍तीमत्त्व, वाक्‌पटुत्‍व इत्‍यादी गुण प्राप्‍त होतात, तर बृहस्‍पतीच्‍या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्‍यात्मिक उन्‍नती, विवेकबुद्धी जागृत होते.

बुधाचे वाहन हत्ती हे उन्‍मत्ततेचे प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्‍मत्तता आपल्‍या बुद्धीमत्तेने, व्‍यक्‍तीत्‍वाचा अंकुश घालून आवर घालावा, हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्‍पतीचे वाहन वाघ हे अहंकाराचे प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो. अहंकार मानवाच्‍या सर्व प्रकारच्‍या प्रगतीमध्‍ये आणि आध्‍यात्‍मिक साधनेतही बाधक ठरतो. त्‍यावर ज्ञानाच्‍या, गुरुकृपेच्‍या आशीर्वादाने ताबा मिळवावा, हे बृहस्‍पतीची प्रतिमा आपल्‍याला शिकवते; म्‍हणूनच बुध आणि बृहस्‍पति यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्‍थान मिळाले.

५. एका मातृशक्‍तीने दुसर्‍या रक्षक आणि पालक शक्‍तीचे केलेले पूजन म्‍हणजेच जिवती पूजन !

प्रथम रक्षक देवता, नंतर जन्‍मलेल्‍या बालकाचे रक्षण आणि दीर्घायुष्‍य देणारी देवता अन् नंतर व्‍यक्‍तीमत्त्व प्रभावित करणारे ग्रह देवता, असा हा जिवती प्रतिमेचा क्रम असतो. एका मातृशक्‍तीने दुसर्‍या रक्षक आणि पालक शक्‍तीचे केलेले पूजन, म्‍हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍याची, रक्षणाची प्रार्थना म्‍हणजेच जिवती पूजन !

या प्रतिमेचे पूजन करून घरातील मुला-बाळांना नमस्‍कार करायला सांगावे आणि श्रावण संपल्‍यावर या प्रतिमेचे विसर्जन करावे. (श्रावण अमावास्‍येला हा कागद उपडा करून ठेवायचा आणि दुसर्‍या दिवशी तो विसर्जन करण्‍याची प्रथा आहे. श्रावणाच्‍या नंतर मुलांना हा कागद दिसता कामा नये, अशी समजूत आहे.)

– श्री. आनंद साऊरकर

(साभार : फेसबुक)