साडी परिधान केल्यामुळे चैतन्य मिळणे आणि आचारधर्म पालनाचे महत्त्व लक्षात येणे

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

१. साडी नेसल्यामुळे आरंभी आध्यात्मिक त्रासात वाढ होणे; परंतु नंतर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन प्रसन्न आणि हलके वाटणे

‘सप्टेंबर २०२२ च्या अखेरच्या आठवड्यात आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये नवरात्रीच्या कालावधीत आश्रमात होणार्‍या यागांनिमित्त मी देवीचे चैतन्य अधिक प्रमाणात ग्रहण व्हावे, यासाठी साडी नेसत होते. मला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने मला साडी नेसतांना किंवा नेसल्यावर ‘अस्वस्थ वाटणे, घुसमटल्यासारखे होणे, ‘साडी पालटून पोषाख घालूया’, असे विचार येणे’, अशा प्रकारचे त्रास होत असतात. सकाळी साडी परिधान केल्यावर दुपारनंतर साडीच्या माध्यमातून माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन मला प्रसन्न आणि हलके वाटायचे.

२. साडी नेसतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्मरण आणि नामजप अन् प्रार्थना होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्रासांवर मात करता येऊन साडी नेसणे

मला आध्यात्मिक त्रास होत असला, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने माझे त्रासाशी लढून त्यावर मात करत साडी नेसणे चालूच होते. त्यामुळे मला साडी नेसतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्मरण होणे, साडीच्या निर्‍या घालत असतांना नामजप होणे, प्रार्थना होणे, हलके वाटणे, अशा अनुभूती येत आहेत. साडी नेसण्यापूर्वी ‘या साडीचा मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊ दे’, अशी प्रार्थना मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या आवाजात काही वेळा ऐकू येते.

३. साडी नेसल्यामुळे त्रासदायक शक्तीचे आवरण उणावणे आणि आनंदी असल्याचे जाणवणे

मला मागील ४ – ५ दिवसांत माझ्या देहाभोवती आनंदाचे तरंग जाणवत आहेत. माझ्या प्रसन्नतेत वाढ होऊन मला पुष्कळ हलके वाटत आहे. काही वेळा रात्री झोपतांनाही साडी नेसल्याने मला सकाळी लवकर ऊठता येऊ लागले. मला माझ्यावर अनिष्ट शक्तींचे सूक्ष्म त्रासदायक आवरण जाणवले नाही. अनेक साधकांनी मला सांगितले, ‘तू या दिवसांत आनंदी दिसत आहेस.’ तेव्हा ‘या आनंद तरंगांचे प्रमाण पुष्कळ अधिक असल्याने त्यांनाही ते जाणवले’, हे मला लक्षात आले. दिवसभरातही माझ्यावर त्रासदायक आवरण येण्याचे प्रमाण अन्य दिवसांच्या तुलनेत उणावल्याचे मला जाणवले.

४. साडी नेसल्याने मला आध्यात्मिक उपायांच्या वेळी क्षात्रवृत्ती अधिक जाणवली आणि मला ‘साडी म्हणजे एक शस्त्र आणि कवच आहे’, असेही काही वेळा अनुभवता आले.

‘हे गुरुराया, मला तुमच्याच कृपेने आचारधर्माचे महत्त्व समजले. माझ्या तीव्र त्रासातही माझ्याकडून त्याचे पालन झाले. त्यातील आनंदाची अनुभूती घेता आली. दैनंदिन जीवनातील साडी नेसण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीतूनही आनंद देऊन तो घेण्यास तुम्ही मला शिकवले, त्याबद्दल कृतज्ञता !’

– आधुनिक वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी, फोंडा, गोवा.(६.११.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक