Jharkhand Train Accident : झारखंडमध्ये ‘हावडा-मुंबई एक्सप्रेस’चे १८ डबे रुळावरून घसरले : ३ जणांचा मृत्यू

रांची (झारखंड) – झारखंडमधील चक्रधरपूर येथे ३० जुलैच्या पहाटे हावडा-मुंबई एक्सप्रेसचे १८ डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला. यात ३ जण ठार झाले, तर १५० हून अधिक जण घायाळ झाले. या रेल्वेचे डबे रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले. घटनास्थळी साहाय्य कार्य चालू आहे. घायाळांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातानंतर या मार्गावरील अनेक गाड्या रहित करण्यात आल्या आहेत.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघात होणार असल्याची कुणकुण लागताच चालकाने रेल्वेचा वेग न्यून केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा मृतांचा आकडा वाढला असता.

संपादकीय भूमिका

रेल्वे गाड्यांचे डबे रुळावरून घसरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामागे काही घातपात आहे का ?, याचा शोध घेतला पाहिजे !