मोगलांना भिडणारे मावळे निर्माण करण्याचे कार्य करत आहोत ! – सुनील पवार, अध्यक्ष, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती

प्रत्येक हिंदु मावळा बनला, तर येणार्‍या काळातील मोगलाईपासून त्याचे रक्षण होईल !

श्री. सुनील पवार

मुंबई – ज्या मोगलांनी छत्रपती शंभूराजांना हालहाल करून मारले, त्याच मोगलांचे संकट अजूनही आहेच; म्हणून अशा प्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी आपण रायगडावर उभे राहून मोगलांना भिडणारे मावळे निर्माण करण्याचे कार्य करत आहोत, असे उद्गार श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी काढले. ‘श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड’च्या वतीने ‘जागर शिवराज्याभिषेकाचा, सन्मान शिवसमिधांचा’ हा विशेष कार्यक्रम दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता.

२८ जुलैला पार पडलेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचा ‘शिवसन्मान पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. तसेच ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांचा मराठा तलवार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ नाणीसंकलक अशोकसिंह ठाकूर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, बडोदा संस्थानचे वंशज डॉ. हेमंत राजे गायकवाड, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असीलता राजे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

‘ओम प्रमाणपत्र’ मोहिमेत सहभागी होऊन आर्थिक युद्ध लढूया ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

श्री. रणजित सावरकर

महाराष्ट्रावर किंवा भारतावर पुन्हा मोगलाई येण्याचा प्रचंड धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण हिंदूंनी निर्धास्त न होता, तसेच निष्क्रीय न होता छत्रपती शिवाजी महाराजांची नीती वापरून हे युद्ध आर्थिक नीतीने लढले पाहिजे. श्रद्धेचे युद्धही त्याच पद्धतीने लढले पाहिजे. त्यासाठीच ‘ओम प्रमाणपत्र’ ही मोहीम चालू केली आहे. आपण सगळे शिवरायांचे मावळे आहात, कर्तृत्ववान आहात. त्यामुळे या प्रमाणपत्र वितरण मोहिमेत अवश्य सहभागी व्हा !

छत्रपती शिवरायांच्या काळात श्रद्धेवर आक्रमण होत असे; कारण ‘श्रद्धा संपली की, शक्ती संपते’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत. “महाराष्ट्रात मंदिराबाहेर जे पेढे किंवा प्रसाद मिळतो, ते सर्व पदार्थ बर्‍याचदा गायीची चरबी वापरून बनवले जातात. श्रद्धास्थाने संपवण्याचे हे कटकारस्थान आहे. त्यामुळे इथे शिवरायांची नीती वापरायला हवी. ‘ओम प्रमाणपत्रां’च्या कार्यासाठी कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. हिंदु धार्मिक स्थळांच्या बाहेर पेढे, प्रसाद विक्रेते असतात. त्यांना ओम प्रमाणपत्र वितरित करून आपण मावळे होऊन धर्मकर्तव्य पार पाडा.

ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब म्हणजेच बाळकृष्ण सदाशिव परब यांनी इतिहासातील विविध विषयांवर ३५ पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक कार्यासाठी विविध सामाजिक आणि शासकीय पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. यासमवेत रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा यशस्वी करण्यासाठी कष्ट घेणार्‍यांचाही मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आप्पा परब यांच्या ‘शिवराज्याभिषेक’ या पुस्तकाचे, डॉ. हेमंत राजे गायकवाड यांच्या ‘द ग्रेट शिवाजी-फादर ऑफ नेव्ही’ या पुस्तकाचे, तर श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या ‘इतिहासमंथन’ या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.