Maharashtra Missing Girls : वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत महाराष्ट्रातून १ लाख युवती बेपत्ता !

आज न्यायालयात होणार सुनावणी !

मुंबई – वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती देणारी जनहित याचिका सांगली येथील शहाजी जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली आहे. या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार वर्ष २०१९ मध्ये ३५ सहस्र ९९०, वर्ष २०२० मध्ये ३० सहस्र ८९ आणि वर्ष २०२१ मध्ये ३४ सहस्र ७६३ इतक्या १८ वर्षांवरील युवती महाराष्ट्रातून हरवल्या आहेत. या याचिकेत त्यांनी न्यायालयाची निरीक्षणेही नोंदवली आहेत. ३० जुलै या दिवशी या याचिकेवर सुनावाणी होणार आहे.

जगताप यांची विज्ञान शाखेच्या तिसर्‍या वर्षाला शिकणारी मुलगी डिसेंबर २०२१ पासून हरवली आहे. सांगली येथील संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करूनही तेथील पोलीस मुलीचा शोध घेऊ शकलेले नाहीत. जगताप यांना असे समजले आहे की, त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे आणि तिचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले आहे.

जगताप यांनी याचिकेत म्हटले आहे की, ते गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत केवळ २ मिनिटे त्यांच्या मुलीला भेटू शकले आणि त्यांच्या कुटुंबापासून तिचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मुलगी अल्पवयीन नसल्याने पोलिसांनी तिला शोधण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. हरवलेल्या मुलींचे छळ किंवा बळजोरीने धर्मांतर झालेले असू शकते. (या दाव्यात तथ्य असेल, तर महाराष्ट्र पोलिसांना हे लज्जास्पदच ! – संपादक)