विशाळगडावरील ‘लँड जिहाद’ची उच्चस्तरीय चौकशी करा ! – कुंदन पाटील, विश्व हिंदु परिषद, जिल्हाध्यक्ष

डावीकडून अक्षय ओतारी, कुंदन पाटील आणि नीलेश शिंदे

कोल्हापूर – गजापूर येथील ज्या वस्तीला हिंदुत्वनिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे याला तेथील लोकच कारणीभूत आहेत. येथे रहाणार्‍या मुसलमानांपैकी ८ लोकांची घरे विशाळगडावर अतिक्रमणामध्ये आहेत. यापूर्वी जेव्हा गडदुर्गप्रेमी गडावर जात असत, तेव्हा त्यांना मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. गडावरील मंदिराकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. विशाळगडावर वर्ष २०१८ मध्ये २१६ घरे होती, तर २०२२ मध्ये ती २५५ झाली होती. ही घरे वाढली कशी ? त्यामुळे विशाळगडावर ‘लँड जिहाद’ होत असून या सर्व प्रकरणाची चौकशी होण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीचे गठण करून चौकशी व्हावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी २५ जुलैला पत्रकार परिषदेत घेतली. या प्रसंगी बजरंग दलाचे नीलेश शिंदे, अक्षय ओतारी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई उपस्थित होते.

१९ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार्‍यांवर गुन्हे नोंद करा !

कुंदन पाटील पुढे म्हणाले, ‘‘जमावबंदीचा आदेश असतांना काही धर्मांधांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. ज्या प्रमाणे विशाळगड येथे आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे नोंद करण्यात आले त्याचप्रमाणे याही लोकांवर गुन्हे नोंद झाले पाहिजेत. या संदर्भात आम्ही जिल्हा प्रशासनास निवेदन देऊनही यांपैकी कुणावरही गुन्हे नोंद झालेले नाहीत. त्यामुळे विशाळगडावरील अतिक्रमणापासून एकूणच सर्व प्रकरणात महसूल प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे.

खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत !

आम्ही खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा आदर करतो; मात्र त्यांनी हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडी गजापूर येथे गेली असतांना छत्रपती शाहू महाराज यांनी हिंदूंना ‘आतंकवादी’ असे जे संबोधले आहे, ते शब्द त्यांनी मागे घ्यावेत, अशी आम्ही मागणी करतो. याचसमवेत तसे त्यांना कुणी बोलायला भाग पाडले का ? हेही त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.

गडावर सातत्याने वाढणार्‍या अतिक्रमणाकडे प्रशासन कधी लक्ष देणार ?

याच गडावर काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फलक लावण्यात आला होता. त्यावर बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयी माहिती होती. या फलकास काही समाजकंटकांनी काळे फासले होते ! याचा तेथे असलेल्या विशाळगडावरील आणि खाली गजापूर येथील ग्रामस्थांनी निषेध का केला नाही ? जर ते स्वत:ला शिवप्रेमी म्हणवून घेतात, तर त्यांनी हा निषेध करणे अपेक्षित होते. असे झाले नाही यातूनच गडावर होत असलेले अतिक्रमण, पशूहत्या आणि अनेक अवैध कृत्यांना या सगळ्यांना पाठिंबा असल्याचे सिद्ध होते. विशाळगडावरील घरांची संख्या ही प्रशासनाने २५५ सांगितली आहे.विशाळगडावर सध्यस्थितीत ५८८ लोक रहात असून त्यातील ८४ लहान मुले आहेत, मग उर्वरित ५०४ लोकांसाठी २५५ घरे कशासाठी ? तेथील घरांची संख्या ही सातत्याने वाढत असून याकडे प्रशासन कधी लक्ष देणार आहे ?