(म्‍हणे) ‘अतिक्रमण हटवण्‍याच्‍या नावाखाली कट्टर हिंदुत्‍वनिष्‍ठांचा विशाळगडावर हिंसाचाराचा कट !’ – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष

आमदार रईस शेख

मुंबई – ‘चलो विशाळगड’ अशी घोषणा करून हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी विशाळगडावर हिंसाचार घडवला. विशाळगडावरील दर्गा आणि मशीद पाडण्‍यात आली. मुसलमानांची घरे, दुकाने, वाहने आदी मालमत्तेची तोडफोड करून जाळपोळ करण्‍यात आली. हा हिंसाचार घडवणार्‍यांना तडीपार करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राष्‍ट्रीय अल्‍पसंख्‍यांक आयोगाकडे केली आहे.

यामध्‍ये रईस शेख यांनी म्‍हटले आहे की, हिंसाचारात सहभागी असलेल्‍या ५०० दंगलखोरांवर कोल्‍हापुरातील शाहूवाडी पोलीस ठाण्‍यात ४ गुन्‍हे नोंदवण्‍यात आले आहेत. जिल्‍हा पोलीस अधीक्षकांच्‍या देखरेखखाली हा हिंसाचार घडल्‍यामुळे अल्‍पसंख्‍यांक समुदायाचा पोलीस आणि सरकार यांवरील विश्‍वास उडाला आहे. या हिंसक घटनेचा अहवाल मागवून पीडितांना १५ दिवसांमध्‍ये हानीभरपाई द्यावी. हिंसाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. या हिंसाचाराची सी.आय्.डी. चौकशी करावी.

संपादकीय भूमिका 

मुसलमानांवर आक्रमण झाल्‍याची ओरड करणारे आमदार गडावरील अतिक्रमण हटवण्‍याविषयी का बोलत नाहीत ?