हिंदूंच्याच पैशांवर काश्मीरमधील अर्थकारण आणि जिहाद पोसला जात आहे ! – आनंद दवे, अध्यक्ष, हिंदु महासंघ

वाढत्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची हिंदु महासंघाची मागणी !

आनंद दवे, अध्यक्ष, हिंदु महासंघ

पुणे – केंद्रात नरेंद्र मोदी सरकार तिसर्‍यांदा सत्तेवर येताच जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया वाढल्या आहेत. मागच्या महिन्यात रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवर आक्रमण झाले होते. जम्मूमध्ये हे आक्रमण झाले होते. या आक्रमणात यात्रेकरूंचा मृत्यू झाला. ३३ जण घायाळ झाले. त्यानंतर ८ जुलैला कठुआ येथे आतंकवाद्यांनी भारतीय सैन्याच्या ताफ्यावर आक्रमण केले. यात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. काश्मीरमधील मुसलमानांना हिंदू नकोच आहेत. ‘तुम्ही या, फिरा आम्हाला पैसे द्या आणि परत जा’, एवढ्यासाठीच त्यांना हिंदू हवे आहेत. हिंदूंच्याच पैशांवर तेथील अर्थकारण आणि जिहाद पोसला जात असून त्यासह केंद्र सरकार त्यांना कोट्यवधी रुपयांची भीक (निधी) देत आहे. यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या, तरच हे गप्प रहातील, असे वक्तव्य करत हिंदु महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी काश्मीरवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

श्री. आनंद दवे पुढे म्हणाले की,

१. काश्मीरच नव्हे, तर जम्मूमध्येही अतिरेकी आक्रमणे वाढली आहेत. मागील ३ महिन्यांत २० आक्रमणे आणि ७० हिंदूंच्या हत्या झाल्या आहेत. ‘ही अतिरेकी आक्रमणे करणारे कोण आहेत ? ते कुठे लपलेत ?’, हे सर्व स्थानिकांना ठाऊक असते; पण तेथील स्थानिक याविषयी गप्प रहातात.

२. आम्ही महाराष्ट्रामधील सर्व पर्यटन आस्थापनांना काश्मीरमध्ये आयोजित केलेल्या सहली रहित कराव्यात, असे पत्र पाठवत असून लोकांनाही काश्मीरला न जाण्याची विनंती करत आहोत.