सद्गुरूंचे आज्ञापालन करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधिकेला स्वप्नात ग्रंथ लिहिण्यास सांगणे

कु. मनीषा माहुर

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने आम्ही सर्व साधक मथुरा येथील सेवाकेंद्रात स्थलांतरित झालो. मथुरेला आल्यानंतर त्याच मासात एक दिवस मला स्वप्न पडले. मला स्वप्नात दिसले, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ मथुरा आश्रमात आल्या आहेत आणि मी त्यांना पिण्यासाठी पाणी देत आहे.’ त्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘आतापर्यंत इतर सेवा झाली. आता तू ग्रंथ लिही.’

२. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ देत असलेल्या पाण्याचा ‘तीर्थ’ म्हणून स्वीकार करायला हवा’, असे सद्गुरु पिंगळेकाका यांनी सांगितल्यावर चूक लक्षात येणे

त्या वेळी मी त्यांना देत असलेला पाण्याचा पेला त्या मला परत देत होत्या. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘हे पाणी आपल्यासाठी आहे.’ या स्वप्नाविषयी मी सद्गुरु पिंगळेकाकांना सांगितले. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ तुला पाणी परत देत होत्या, त्याचा तू ‘तीर्थ’ म्हणून स्वीकार करायला हवा होतास.’ तेव्हा मला माझी चूक लक्षात आली.’

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पाणी देतांना ‘ते तीर्थ आहे’, अशा भावाने कुटुंबियांनी तीर्थ घेणे

त्यानंतर मार्च २०२४ मध्ये मी माझ्या कुटुंबियांच्या समवेत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी आम्हा कुटुंबियांची सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांनी कुटुंबातील सर्वांना प्रसाद दिला आणि ‘‘पाणी पाहिजे का ?’’, असे विचारले. त्यांनी असे विचारल्यावर मला सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितलेले सूत्र आठवले. तेव्हा ‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका तीर्थ देत आहेत’, असा भाव मनात जागृत झाला आणि आम्ही सर्वांनी ते तीर्थ घेतले. ‘सद्गुरु आणि संत आपल्याला जे सांगतात, त्याचा आपल्याला पुढील काळात लाभ होत असतो’, हे माझ्या लक्षात आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची ही कृपा अनुभवल्यानंतर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘सनातनचे तीनही मोक्षगुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ) सतत आपल्या समवेत असून त्यांचे आपल्यावर लक्ष असते’, याची मला अनुभूती आली. त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ, सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाका आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. मनीषा माहुर, मथुरा सेवाकेंद्र (१३.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक