लाभार्थ्यांनी शासनाला पत्र लिहून योजना कलंकित करणार्‍यांना उत्तर द्यावे ! – पालकमंत्री उदय सामंत

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ महिलांसाठी ऐतिहासिक योजना

रत्नागिरी – ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ ही राज्यातील महिलांसाठी ऐतिहासिक योजना आहे. या योजनेचा लाभ मिळल्यानंतर शासनाला पत्र लिहून ही योजना कलंकित करणार्‍यांना उत्तर द्यावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेतील लाभार्थ्यांना संमतीचे पत्र वितरण करून पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले,

१. उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील अडीच कोटी महिलांसाठी ४६ सहस्र कोटी रुपयांचे प्रावधान अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. एकाच दिवशी ५ सहस्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याचा आजचा कार्यक्रम हा राज्यातील एकमेव कार्यक्रम आहे.

२. या योजनेत अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरून घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत. महिलांना सक्षम करणारे शासन आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोचवून त्यांना लाभ देणारा रत्नागिरी जिल्हा प्रथम क्रमांकाचा ठरेल.

३. प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन शासनाच्या कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवाव्यात.