चारचाकीच्या अपघातात सद्गुरु स्वाती खाडये आणि साधक यांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

सद्गुरू स्वाती खाड्ये

१. महामार्गावर एका ठिकाणी उभ्या करून ठेवलेल्या चारचाकी गाडीला दुचाकी गाडीने जोरात धडक देणे

‘२.५.२०२४ या दिवशी कोल्हापूर येथे आमचा प्रचारदौरा चालू असतांना आम्ही (मी, सौ. उल्का जठार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि श्री. महेश चौधरी) ‘कोल्हापूर ते गडहिंग्लज’ असा प्रवास करत होतो. दुपारी १२ वाजता आम्ही कोल्हापूर-बेंगळुरू महामार्गावर एके ठिकाणी गाडी मुख्य मार्गापासून पूर्णपणे बाजूला घेऊन थांबलो होतो. त्या वेळी त्या मार्गावरून दुचाकीवरून प्रवास करणारे दोघे जण दुचाकीसह आमच्या गाडीच्या मागच्या बाजूला जोरात धडकले आणि मुख्य मार्गावर जाऊन पडले. खरेतर त्या मार्गावर वाहनांची बरीच वर्दळ असते; परंतु त्या ५ मिनिटांत एकही वाहन आले नाही.

२. चारचाकी गाडीची पुष्कळ हानी होणे; मात्र दुचाकी गाडी आणि दुचाकीस्वार सुरक्षित असणे

या अपघातात आमच्या वाहनाच्या मागील बाजूची पुष्कळ हानी झाली; मात्र त्यांच्या दुचाकीला काहीच झाले नाही, तसेच कुणालाही काहीच लागले नाही. या अपघातात आमची काहीही चूक नसतांना ते दुचाकीस्वार आमच्यावर ओरडत होते.

३. ‘आमच्या चारचाकी गाडीची झालेली हानी पहाता आमच्या चारचाकी गाडीला दुचाकी गाडीने धडक दिली आहे’, असे कुणालाच वाटत नव्हते. एखाद्या मोठ्या वाहनाने धडक दिल्यासारखी आमच्या चारचाकी गाडीची स्थिती झाली होती.

४. आमच्या चारचाकी गाडीला जोरात धडक बसूनही आम्हाला काहीच लागले नाही किंवा गाडीतल्या गाडीत आम्ही आपटलोही नाही.

५. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘हे अनिष्ट शक्तींचे मोठे आक्रमण आहे’, असे सांगणे आणि अपघातात सापडलेले सर्व जण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सुखरूप असणे

अनेक जणांनी आम्हाला सांगितले, ‘‘ज्या ठिकाणी तुमच्या वाहनाला अपघात झाला, त्या ठिकाणी या पूर्वी बरेच अपघात झाले आहेत; मात्र त्या अपघातात कुणीच वाचले नाहीत.’’ आम्ही श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी बोलल्यावर आम्हाला समजले, ‘हे अनिष्ट शक्तींचे मोठे आक्रमण होते.’ केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्ही आणि ते दुचाकीस्वार सुखरूप राहिलो.’

– (सद्गुरु) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (२.५.२०२४)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक