बांगलादेशी खासदार अनार यांच्या हत्येमागे तस्कर, गुन्हेगार, बांगलादेशी घुसखोर यांचा हात !

बंगालची २ सहस्र २१७ किलोमीटरची सीमा बांगलादेशला लागलेली आहे आणि या सीमेवर तस्करी अन् घुसखोरी हा एक मोठा व्यवसाय आहे. तस्कर आणि घुसखोर यांच्याकरता ‘आओ जाओ घर तुम्हारा’, हे तत्त्व बंगालमध्ये पाळले जाते. सोने, अफू, गांजा, चरस, खोट्या नोटा, तस्करी, गुरे पळवणे, दरोडेखोरी, माणसे पळवणे, गुन्हेगारांना पळायला साहाय्य करणे, महिला आणि मुले यांचा व्यापार करणे इत्यादी सीमेपलीकडून येऊन केले जाणारे गुन्हे हे एक वास्तव अन् उपजीविकेचा भाग आहे. कायदेशीर कारवाई रोखण्याकरता उभय देशांतील गुन्हेगारांनी दुसर्‍या देशात पळून गेलेले असतांना, परस्परांना आश्रय पुरवण्याविषयी जणू एक करार केला आहे. सीमेपलीकडे पळून जाणे सोपे असते; म्हणून गुन्हेगार गुन्हा करून पळून जातात आणि कायद्याचा दबाव नाहीसा होईपर्यंत बांगलादेशात सहानुभूतीदार अन् नातेवाईक यांच्याजवळ आश्रय घेतात.

आपण जेव्हा बांगलादेशी खासदार अनार यांच्या हत्येचे विश्लेषण करतो, तेव्हा असे दिसते की, यामध्ये तस्कर, गुन्हेगार, बांगलादेशी घुसखोर यांचा मोठा हात आहे. सीमेवर तस्करी करणार्‍या वेगवेगळ्या गटांमध्ये होणार्‍या स्पर्धेमुळे किंवा वैरामुळे ही हत्या झाली असावी.

‘अवामी लीग’चे खासदार अन्वारुल अझीम अनार

१. बंगालमधील कायदा सुव्यवस्थेच्या दयनीय स्थितीविषयी कोलकाता उच्च न्यायालयाने मांडलेले मत

बंगालमध्ये निवडणुकोत्तर हिंसाचार पुन्हा भडकला असून तृणमूल काँग्रेसच्या विरोधात मतदान केलेले मतदार, काँग्रेस, भाजप, साम्यवादी कार्यकर्ते यांच्यावर हिंसक आक्रमणे चालू झाली आहेत. अनेक भागांतून हिंदू कुटुंबांना पलायन करावे लागले आहे. कोलकाता उच्च न्यायालयानेही याची नोंद घेतली असून ‘हिंसाचार थांबला नाही, तर येणारी ५ वर्षे राज्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला तैनात करावे लागेल’, अशी चेतावणीही कोलकाता उच्च न्यायालयाने दिली आहे. यावरून तेथील स्थिती किती भयावह आहे, याचा अंदाज यावा.

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

२. बांगलादेश खासदाराचा कोलकात्यात मृतदेह आढळणे

बांगलादेशातील सत्ताधारी पक्ष ‘अवामी लीग’चे खासदार अन्वारुल अझीम अनार हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. २२ मे या दिवशी कोलकाता येथील एका सदनिकेमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. खासदार अनार हे १२ मे या दिवशी उपचार घेण्यासाठी कोलकाता येथे आले होते. त्यानंतर अन्वारुल अझीम अनार हे कोलकाता येथील एका मित्राच्या घरी भेटण्यासाठी गेले. तेथून डॉक्टरांकडे उपचारासाठी जायचे, असे सांगून बाहेर पडले. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी सांगितले की, आम्हाला त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात ३ संशयितांना कह्यात घेण्यात आले आहे.

३. बांगलादेशी खासदाराची भारतात हत्या कशी झाली ?

बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी सांगितले, ‘‘अनार यांची कोलकाता येथील एका घरात नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करण्यात आली.’’ गृहमंत्री खान यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या हत्येत बांगलादेशातील लोक सामील होते.

अन्वारुल अझीम अनार यांनी बांगलादेशातील झेनैदह-४ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ५ जानेवारी २०१४ या दिवशी ते पहिल्यांदा संसदेवर निवडून आले होते. वर्ष २०१८ च्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. भारत-बांगलादेश सीमेवरील झेनैदह हे क्षेत्र गुन्हेगारीसाठी ओळखले जाते. वर्ष २००८ मध्ये ‘इंटरपोल’ने अनार यांच्याविरुद्ध शस्त्रे आणि स्फोटकांसह अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नोटीस जारी केली होती. वर्ष २०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांना सर्व आरोपातून मुक्त करण्यात आले.

अनार हे १२ मे या दिवशी बारानगरमधील मंडोलपारा येथे सोन्याचे व्यापारी असलेल्या गोपाल बिस्वास या मित्राच्या घरी गेले होते. दुसर्‍या दिवशी ते डॉक्टरांना भेटण्यासाठी निघाले आणि तेव्हापासून ते बेपत्ता होते. बिस्वास यांनी बारानगर पोलिस ठाण्यात अनार बेपत्ता असल्याची तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.

पोलिसांना कोलकाता उपनगरातील त्यांच्या सदनिकेमध्ये रक्ताचे डाग आढळले होते. याच ठिकाणी अनार यांना शेवटचे पाहिले गेले. १३ मे या दिवशी ते इतर तिघांसह सदनिकेमध्ये प्रवेश करतांना दिसले. यावरून त्यांच्या समवेत काहीतरी गैर घडल्याचा आणि त्यांची हत्या झाल्याचा संशय निर्माण झाला. १३ मे या दिवशी दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास अनार हे कोलकाता येथील रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टला भेटण्यासाठी भाड्याच्या कारमधून निघाले. ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले, ‘त्यांनी न्यू मार्केट परिसरातून आणखी एका बांगलादेशी नागरिकाला आपल्यासह घेतले आणि नंतर न्यू टाऊनमधील सदनिकेकडे निघाले.’ ‘सीसीटीव्ही फुटेज’मध्ये अनार यांच्यासह २ पुरुष आणि १ महिला सदनिकेत शिरल्याचे दिसून आले आहे. पुढच्या ३ दिवसांत हे तिघेही सदनिकेच्या बाहेर पडले; मात्र त्यांच्या समवेत अनार कुठेही दिसले नाहीत.

बांगलादेशचे खासदार ज्या सदनिकेमध्ये शेवटचे दिसले होते, ती सदनिका बंगाल सरकारच्या कर्मचार्‍याच्या मालकीची आहे. त्याने ही सदनिका अख्तरझमन नावाच्या अमेरिकन नागरिकाला भाड्याने दिली होता, जो एक संशयित आहे. अनार यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला मायदेशी आणण्यासाठी बांगलादेशचे सरकार ‘इंटरपोल’चे साहाय्य घेणार आहे.

४. बहुतेक संशयित बांगलादेशी घुसखोर

बांगलादेशी घुसखोर

बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येप्रकरणी बंगाल पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. बंगाल राज्य गुन्हे विभागाने (‘सीआयडी’ने) बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातून सियाम हुसेन या बांगलादेशीला अटक केली. तत्पूर्वी बंगाल सीआयडीने या प्रकरणात जिहाद हवालदार या बांगलादेशी स्थलांतरिताला अटक केली होती. जिहाद हवालदार हा मुंबईत कसायाचे काम करायचा. त्याने बांगलादेशी खासदाराच्या मृतदेहाचे ८० तुकडे केले आणि त्यांची न्यू टाऊनच्या आसपासच्या कालव्यासह वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट केली. बंगाल सीआयडीने दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बागजोला कालव्यातून अनार यांच्या शरिराचे अवयव जप्त केले. नेपाळमध्ये अटक केलेल्या महंमद सियाम हुसेनने सीआयडीला घटनास्थळी नेले.

५. खासदार अन्वर यांच्या हत्येचे विश्लेषण

बंगाल सीआयडीच्या अधिकार्‍यांनी या हत्येमागे सोन्याच्या तस्करीचा संशय व्यक्त केला होता. अनार आणि त्यांचा अमेरिकेतील मित्र अन् व्यावसायिक भागीदार यांच्यात सोन्याच्या तस्करीवरून झालेला कथित वाद हे या गुन्ह्याचे कारण असावे. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी यापूर्वी अनारच्या हत्येतील प्रमुख संशयित म्हणून एका व्यावसायिकाचे नाव घेतले होते.

बांगलादेशी घुसखोर तस्करीवर अवलंबून रहातात. तस्करी आणि मानवी व्यापारात गुंतलेले माफिया धनवान झालेले आहेत अन् सीमा भागात त्यांनी आपापले बस्तान बसवलेले आहे. भ्रष्ट सरकारी कर्मचारी आणि त्यांचे राजकीय आश्रयदाते यांची तस्करांशी हातमिळवणी झालेली आहे. त्यामुळे अनधिकृत बांगलादेशी घुसखोर सीमा सहज पार करून भारतात प्रवेश करू शकतात. एवढेच नाही, तर भारताचे नागरिक म्हणून रहाण्यास आवश्यक असलेली कागदपत्रेही ते विकत घेऊ शकत आहेत. त्याखेरीज वैध प्रवेशपत्रांवर प्रवेश करणारे बांगलादेशी हे भारतात अधिकृत मुदतीहून अधिक काळ निवास करत आहेत किंवा परतणे टाळतही आहेत.

६. आणखी काय करायला हवे ?

ही तस्करी थांबवण्यामध्ये सीमा सुरक्षा दलाला पूर्णपणे अपयश मिळालेले आहे. बंगाल सरकार आणि त्यांचे पोलीस सीमा सुरक्षा दलाला घुसखोरी थांबवण्याकरता साहाय्य करण्याऐवजी घुसखोरांना साहाय्य करतात. बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरी भूसीमा आणि समुद्री सीमा येथून अविरत चालू आहे. वेळोवेळी काही बांगलादेशी पकडले जातात; परंतु बहुतेक भारतात कायमचे घुसतात. बांगलादेशी व्यक्तींना यापुढे येताक्षणीच मुक्त प्रवेशाची अनुमती (व्हिसा ऑन अरायव्हल) देऊ नये. वैद्यकीय पर्यटनाची प्रथा बांगलादेशवासियांकरता बंद करावी. अनधिकृत घुसखोर, त्यांच्या बिगरसरकारी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणारे सर्व राजकीय पक्ष यांवर बहिष्कार टाकावा. बांगलादेशी घुसखोरी देशाच्या सुरक्षेला असलेला मोठा धोका आहे. ही घुसखोरी आणि सीमेवर होणारी तस्करी थांबलीच पाहिजे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.