‘पुरातन’ वटवृक्षांकडे पावले वळायला हवीत !

‘वटवृक्ष’

अलीकडे, वटपौर्णिमेचे औचित्य साधून पूजनकारणे वडाच्या झाडाच्या फांद्या बाजारात येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. विक्रेते छोट्या-मोठ्या शहरांत सार्वजनिक रस्त्यांच्या आजूबाजूची, जंगलातील किंवा खासगी आवारातील वडाची झाडे किंवा फांद्या तोडत असतात. यावर उपाय म्हणून अनेक शहरातील वृक्षप्रेमींनी वडाच्या रोपांचे वितरण उपक्रम चालू केले आहेत. महिलांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद अभिनंदनीय आहे. या पार्श्वभूमीवर वृक्ष-पर्यावरण जतन-संवर्धन चळवळीचा भाग म्हणून कोकणात गावागावांतील पुरातन वृक्षांचे दस्तऐवजीकरण होण्याची आवश्यकता आहे. दस्तऐवजीकरणातून समोर येणार्‍या माहितीच्या आधारे जनजागरण चळवळ राबवून महिला वर्गाची पावले हळूहळू पुन्हा ‘पुरातन’ वटवृक्षांकडे वळायला हवीत!

‘वटवृक्ष’

महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणे पुरातन ‘वटवृक्ष’ पहायला मिळतात. मागच्या दिवाळीत आम्ही सहकुटुंब बीड जिल्ह्यात पर्यटन-भ्रमण करत असतांना ईमामपूर (बीड) येथील वटवृक्ष आवर्जून पाहिला होता. तिथल्या श्रीकाळभैरवाच्या डोंगरावर मूळवृक्ष बहुधा अस्तित्वात नसलेला आणि पारंब्या वाढलेला हा प्रचंड मोठा वटवृक्ष आहे. चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात आम्ही नागेश संप्रदायाचे ठिकाण असलेल्या आणि हेगरस, अज्ञानसिद्द आदी संतश्रेष्ठांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडवळ गावाला भेट दिली होती. गावातील श्रीनागनाथ मंदिर इतिहासप्रसिद्ध आहे. त्या वेळी प्रसिद्ध कवी-समीक्षक अरुण इंगवले आणि कोकणी लोककलांचे अभ्यासक प्रा. संतोष गोनबरे यांच्यासमवेत आम्ही वडवळ गावातील वडाचे भव्य झाड पाहिले होते. कोकणात गावागावांत आजही महिला वटवृक्ष पूजन करतांना आढळतात. आमचे बालपण गेलेल्या कोकणातील चिपळूण तालुक्यातील अलोरे गावी विश्वकर्मा चौकात असलेले वडाचे झाड कोयना प्रकल्प कार्यालय सेवाकारणे गावात वास्तव्य केलेल्या मागील किमान तीन पिढ्यांच्या आठवणी जपून आहे. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील पेमगिरी (शहागड किल्ल्याजवळ) या ठिकाणी भले मोठे वडाचे झाड आहे. आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील थीमम्मा मरीमानु हे वडाचे झाड, कोलकात्यातील ग्रेट बनियान ट्री, गुजरातमधील भरूच शहरातील कबीरवड, तेलंगाणाच्या मेहबूबनगर जिल्ह्यातील पिल्लालमर्री, रामोहल्ली-बेंगळुरूमधील द बिग वटवृक्ष आदी ठिकाणची वडाची झाडे प्रसिद्ध आहेत.

धीरज वाटेकर

वटपौर्णिमेशी निगडित वटसावित्रीची कथा वडाच्या वृक्षाबरोबर जोडली गेल्याने हा वृक्ष महिलांमध्ये पूजनीय आहे. खरंतर मानवी मनाचा ठाव घेणार्‍या कथानकांशी जोडलेले वृक्ष आणि पर्यावरण महत्त्वाचे आहे. निसर्गचक्रातील वर्तमान प्रदूषित जगात, वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान, वृक्षांची उपयुक्तता लक्षात घेऊन वडासारख्या पुरातन वृक्षांचे अधिकाधिक सान्निध्य मिळवण्यासाठी आपण सर्वांनीच दक्ष असायला हवे आहे. यासाठी कोकणात गावागावांतील पुरातन वृक्षांचे दस्तऐवजीकरण ही चळवळ बनायला हवी आहे.

– लेखक धीरज वाटेकर