पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे प्रातिनिधिक स्तरावर एक ‘स्मारक मंदिर’ उभारण्याचा सरकारचा विचार !  

पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई

पणजी – पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या सर्व मंदिरांची पुनर्बांधणी करणे विविध कारणांमुळे शक्य नाही. याऐवजी अशा सर्व मंदिरांचे प्रातिनिधिक स्तरावर एक ‘स्मारक मंदिर’ उभारण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. गोवा सरकारने यापूर्वी पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्याची घोषणा केली होती आणि लोकांकडून मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी पुराव्यासह माहिती मागितली होती. गोवा सरकारने अशा मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसंकल्पात आर्थिक प्रावधानही केले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री सुभाष फळदेसाई उत्तर देत होते.

मंत्री सुभाष फळदेसाई पुढे म्हणाले, ‘‘ पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांसंबंधी नागरिकांकडून सरकारकडे आतापर्यंत एकूण १९ अर्ज आलेले आहेत. यासंबंधी सरकारनियुक्त समितीचा अहवालही सरकारकडे आलेला आहे. सर्व मंदिरांची पुनर्बांधणी करणे अशक्य आहे; कारण काही ठिकाणी नवीन वाद निर्माण होऊ शकतो किंवा न्यायालयात दावे प्रविष्ट (दाखल) केले जाऊ शकतात. यामुळे सर्व मंदिरांचे एक प्रातिनिधिक मंदिर म्हणून ‘स्मारक मंदिर’ उभारण्यावर सध्या सरकार विचार करत आहे. ‘स्मारक मंदिर’ हे भव्यदिव्य असणार आहे आणि ते तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनस्थळ होणार आहे.’’ नार्वे, डिचोली येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराची सरकारने पुनर्बांधणी केली आहे; मात्र या मंदिराच्या मूळ स्थानी मंदिर उभारण्यासंबंधी अजूनही विचार झालेला नाही.

नवीन वाद निर्माण होणे किंवा न्यायालयात दावे प्रविष्ट (दाखल) होणे, या कारणांमुळे पुनर्बांधणी अशक्य

अन्य धर्मियांनी अत्याचारी राजवटीद्वारे हिंदूंची मंदिरे पाडली आणि मूर्ती फोडल्या. हा इतिहास सर्व धर्मियांना ज्ञात असतांनाही पुरावे असूनही पुन्हा त्याजागी मंदिर उभारायचे, तर इतर धर्मीय त्याला विरोध करतात किंवा न्यायालयात जातात, दंगली करतात. याचा अर्थ आताही अन्य धर्मियांना पूर्वी जी मंदिरे तोडली त्याला समर्थन आहे, असे समजावे लागेल. अशा हिंसेचे समर्थन करणार्‍यांसमवेत तडजोड करून हिंदूंना त्यांच्याच देशात अपमानास्पद जीवन कंठावे लागत आहे.