Kuwait Fire : कुवेत येथील भीषण आगीमध्ये ४० भारतियांचा मृत्यू, तर ३० जण घायाळ

मंगफ (कुवेत) – येथे १२ जूनच्या सकाळी ६ मजली इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण घायाळ झाले. या मृत ४१ पैकी ४० जण भारतीय कामगार आहेत. सर्व घायाळही भारतीयच आहेत. या इमारतीचा वापर कामगारांच्या निवासासाठी केला जातो. आग कशामुळे लागली ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या इमारतीमध्ये जवळपास १६० लोक रहात होते. हे सर्व कामगार एकाच आस्थापनात काम करत होते. या घटनेवर कुवेतमधील भारतीय दूतावासाने शोक व्यक्त करत आपत्कालीन साहाय्यता क्रमांक +९६५-६५५०५२४६ चालू केला आहे.

या घटनेवर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की,

‘ज्यांनी जीव गमावला आहे, त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. मी घायाळांना जलद आणि पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. आमचे दूतावास या संदर्भात सर्व संबंधितांना पूर्ण साहाय्य करेल.’