वाराणसी येथील आश्रमाच्या छायाचित्रांमध्ये निळसर छटा दूरवर पसरलेली दिसण्यामागील आध्यात्मिक कारणे

‘२१.८.२०२३ या दिवशी सायंकाळी ६.३१ वाजता वाराणसी येथील आश्रमाची छायाचित्रे काढण्यात आली. त्यात आश्रमावर निळसर छटा आलेली असून ती दूरवर पसरलेली दिसते. प्रत्यक्षात आश्रमाची वास्तू पांढर्‍या रंगाची आहे. याविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

वाराणसी येथील आश्रम

१. दैवी वास्तूचे प्रकार

१ अ. ईश्वरी वास्तू : विश्वकर्म्याने निर्माण केलेल्या वास्तूंना ‘ईश्वरी वास्तू’, असे म्हणतात. भगवान विश्वकर्मा संकल्पाने पृथ्वीवर विविध वास्तू आणि नगरे यांची निर्मिती करतो. त्या वास्तूंना ‘सिद्ध वास्तू’, असे म्हणतात.

१ आ. परप्रकाशी वास्तू : या वास्तूत पावित्र्य आणि सात्त्विकता असते. त्यामध्ये साधना आणि धर्मरक्षणाचे कार्य करणारे जीव रहातात. अशा वास्तूत वातावरणातील ईश्वरी तत्त्व आकृष्ट होते. त्यामुळे वास्तूच्या भोवती दैवी प्रकाशाची निर्मिती होते. अशा वास्तूला ‘परप्रकाशी वास्तू’, असे म्हणतात, उदा. वाराणसी येथील आश्रम.

१ इ. स्वयंप्रकाशी वास्तू : या वास्तूत भगवंताचा अवतार नांदत असतो. त्या अवतारामुळे ती वास्तू आणि त्याभोवतीचा परिसर हा आनंदी अन् प्रकाशमान झाला आहे. या वास्तूमध्ये वातावरणात दैवी प्रकाश प्रक्षेपित करण्याची क्षमता निर्माण झालेली असते, उदा. रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम. त्या वास्तूत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व आहे. त्यामुळे ही वास्तू स्वयंप्रकाशी मानली आहे.

श्री. राम होनप

२. वाराणसी येथील आश्रमाची वैशिष्ट्ये

२ अ. वाराणसी येथील आश्रमातील जीव साधना आणि धर्मरक्षणाचे कार्य करतात. त्यामुळे या आश्रमावर देवता आणि गुरु यांचे कृपाछत्र आहे.

२ आ. आश्रमाच्या वास्तूतील वास्तुपुरुष प्रसन्न असणे : त्या आश्रमातील जीव साधना आणि धर्मरक्षणाचे कार्य करतात.  त्यामुळे त्या आश्रमातील वास्तुपुरुष प्रसन्न आहे. त्यामुळे त्या वास्तूत पुष्कळ दैवी ऊर्जेची निर्मिती झाली आहे; परिणामी त्या वास्तूच्या वास्तुपुरुषाला ‘वास्तू आणि त्यात रहाणार्‍या जिवांचे पालन करणे आणि रक्षण करणे’, यांसाठी फारसे कार्य करावे लागत नाही.

२ इ. वास्तुपुरुषाच्या गणांची नावे : ‘घट’ आणि ‘अघट’ किंवा ‘विघट’

२ इ १. गणांचा आकार : घट, म्हणजे कलश. वास्तुपुरुषाच्या गणांच्या सूक्ष्मदेहांचा आकार हा घटाप्रमाणे, म्हणजे एखाद्या कलशाप्रमाणे असतो.

२ इ २. ‘घट’ या गणाचे कार्य : ‘घट’ हा शब्द घटनेशी संबंधित आहे. ‘घट’ या गणाचे वास्तूतील चांगल्या आणि वाईट घटनांवर लक्ष असते.

२ इ ३. ‘अघट’ किंवा ‘विघट’ या गणाचे कार्य : या दोन शब्दांतील ‘अ’ आणि ‘वि’ हे शब्द आश्रमाबाहेर घडणार्‍या घटनांशी संबंधित आहेत. समाजात काही चांगल्या किंवा वाईट घटना सतत घडत असतात. त्यांचा त्या वास्तूवर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. ‘अघट’ किंवा ‘विघट’ हा गण त्यांवर लक्ष ठेवतो.

२ इ ४. वास्तूचे गण विशेष घटनांचे संकेत वास्तुपुरुषाला देत असणे : वास्तूतील ‘घट’ हा गण वास्तूत घडणार्‍या विशेष कार्याचे संकेत वास्तुपुरुषाला देत असतो आणि वास्तूबाहेर असलेला ‘अघट’ किंवा ‘विघट’ हा गण वास्तूबाहेरील घटनांचे; परंतु वास्तूवर परिणाम करणार्‍या घटनांचे संकेत त्या वास्तूच्या वास्तुपुरुषाला देत असतो. या गणांच्या संकेतांनुसार वास्तुपुरुष वास्तूच्या कल्याणासाठी आवश्यक असलेले कार्य करतो.

‘घट’ आणि ‘विघट’ या गणांचे प्रधान कार्य ‘वास्तुपुरुषाला वेळोवेळी विविध घटनांच्या सूचना देणे’, हे असते. त्यामुळे त्या गणांना वास्तुपुरुषाचे ‘सूचक गण’, असे म्हणतात.

२ इ ५. वाराणसी आश्रमाच्या वास्तूचे उत्तरदायित्व सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि देवता यांनी सांभाळणे : वाराणसी आश्रमातील जीव साधना आणि धर्माच्या रक्षणाचे कार्य करतात. त्यामुळे त्या वास्तूचे उत्तरदायित्व सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि देवता यांनी घेतलेले आहे. त्यामुळे त्या वास्तूतील वास्तुपुरुष आणि त्याचे गण यांना वास्तू अन् तिच्यातील जीव यांच्यासाठी विशेष कार्य करावे लागत नाही.

३. वाराणसी येथील आश्रमाच्या भोवती दैवी निळसर छटा (‘शिव-विष्णु प्रकाश’) निर्माण होण्याची प्रक्रिया

वाराणसी येथील आश्रमातील साधकांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांकडून प्रक्षेपित होत असलेल्या विष्णुलहरी त्या आश्रमाकडे आकृष्ट होतात आणि भगवान शिवाकडून आश्रमाच्या दिशेने शिवलहरी प्रक्षेपित होतात. विष्णुलहरी आणि शिवलहरी यांच्या मीलनातून निळसर रंगाचा दैवी प्रकाश आश्रमाच्या भोवती निर्माण होतो. त्या दैवी प्रकाशाला ‘शिव-विष्णु प्रकाश’, असे म्हणतात.

३ अ. विष्णुलहरी आणि शिवलहरी यांच्या मीलनातून वाराणसी आश्रमाच्या भोवती निळसर छटा निर्माण होण्याची प्रक्रिया : ‘परात्पर गुरु डॉक्टरांकडून प्रक्षेपित होत असलेल्या विष्णुलहरी आणि भगवान शिवाकडून आश्रमाच्या दिशेने प्रक्षेपित होत असलेल्या शिवलहरी’, यांचे वाराणसी आश्रमाच्या वास्तूभोवती मीलन होते. त्यातून विष्णु आणि शिव यांच्या लहरींनी युक्त तेजतत्त्वाची निर्मिती होते. त्या तेजातून वास्तूच्या भोवती निळसर छटा किंवा प्रकाश निर्माण होतो.

४. आश्रमाच्या भोवती दैवी निळसर प्रकाश निर्माण होण्याचा लाभ : त्या आश्रमात साधना करणार्‍या जिवांचे रक्षण होते, तसेच त्यांना साधना आणि धर्मरक्षणाचे कार्य करण्यासाठी शक्ती अन् स्फूर्ती मिळते.

(वरील विषय ‘दैवी वास्तू आणि तिचे विज्ञान’ या विषयाच्या अंतर्गत येतो.)’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२३)

वाराणसी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाच्या छायाचित्रांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे

‘या आश्रमाच्या तीनही छायाचित्रांच्या ‘यूनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ने चाचण्या केल्यावर त्या छायाचित्रांत नकारात्मक ऊर्जा काहीच नसून अनुक्रमे १०५.८० मीटर, ११४.८० मीटर आणि ९६.६० मीटर सकारात्मक ऊर्जा आढळून आली. यातून आश्रमात पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याचे लक्षात येते. ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ हे या आश्रमात वास्तव्यास आहेत. त्यांच्यातील चैतन्याचा सकारात्मक परिणाम अन् साधकांची साधना यांचा सकारात्मक परिणाम आश्रमाची वास्तू आणि आश्रम-परिसर यांवर झाला आहे’, असे जाणवले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (३१.८.२०२३)