योग्य वेळी जागे (सावधान) होऊन प्रभु कार्यासाठी घराबाहेर पडणे आवश्यक !

प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले

योग्य वेळी जागे होण्यातच खरे कल्याण आहे. आज माणसे ५० – ५५ वर्षांची झाली, तरी आळशासारखे घरातच पडून असतात. घरातून बाहेर पडून प्रभु कार्याला लागावे, उर्वरित जीवन भगवंताच्या कामात घालवावे, असे त्यांना वाटतच नाही. कुटुंबात त्यांची गरज राहिली नसली, तरी ते घरातच पडून रहातात. ‘सर्व परिवार त्यांना निभावून नेतो’, याची त्यांना लाज वाटत नाही. कुटुंबात त्यांना कोणतेही स्थान नसते. असलेच, तर व्यवहार म्हणून असते. इतके असूनही ते कुटुंबातच पडून रहातात. माणसाने ‘यथाकालप्रबोधिनाम् ।’ (रघुवंश, सर्ग १, श्लोक ६) म्हणजे ‘योग्य वेळी जागे (सावधान) होऊन प्रभु कार्यासाठी घराबाहेर पडले पाहिजे, तरच ते जागे झाले (सावधान झाले)’, असे म्हणता येईल. प्रभूच्या सभेत (दरबारात) त्यांना ‘सज्जन’ म्हटले जाईल.’

(साभार : ग्रंथ ‘भारतीयांचे सांस्कृतिक आदर्श जीवन’ – प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने)