रोहित वेमुला याच्या आत्महत्येचे प्रकरण म्हणजे साम्यवाद्यांचा अपप्रचार !

हिंदूंमध्ये खोटे कथानक मांडून फूट पाडणारे साम्यवाद्यांचे षड्यंत्र जाणून त्याचे समूळ उच्चाटन करायला हवे !

भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथील रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या संदर्भात ३ मे २०२४ या दिवशी हैद्राबाद पोलिसांनी महत्त्वाचा निष्कर्ष सादर केला. यानिमित्त वेमुलाचे जातीय प्रमाणपत्र खोटे असल्याचे उघड झाले. देशात फूट पाडून ‘शोषक विरुद्ध शोषित’ याच चष्म्याने जगाकडे पहाणार्‍या विचारधारेचे वाहक ‘दलित विरुद्ध इतर’ हा खोटा ‘प्रपोगंडा’ (प्रचार) केला. यातून जातीय राजकारण निर्माण करून समाज कलुषित करण्याचे पातक देशात फूट पाडणारे करत आहेत, हे या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.

१. पोलिसांनी काढलेला निष्कर्ष आणि त्यावरून येणारे प्रश्न

शांभवी प्रमोद थिटे

हैद्राबाद विद्यापिठात वर्ष २०१६ मध्ये घडलेल्या रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणी पोलिसांनी ‘वेमुलाचे जातीय प्रमाणपत्र खोटे असल्याने स्वतःची खरी ओळख उघड होईल, या भीतीपोटी त्याने स्वत:चा जीव घेतला तसेच त्याचे जातीय प्रमाणपत्र अनुसूचित जातीच्या श्रेणीचे होते; परंतु त्याचे वडील ओबीसी म्हणजे इतर मागास वर्गात मोडणार्‍या वडार समाजातील होते. त्याच्या भावाचे जातीय प्रमाणपत्र हे इतर मागास वर्गातील असल्याने शंकेला अजूनच वाव आहे’, असा महत्त्वाचा निष्कर्ष सादर केला. या सगळ्या प्रकरणात २ प्रश्न प्रामुख्याने समोर येत आहेत.

अ. एक म्हणजे खोटा जातीय दाखला रोहित वेमुलाला कुठून मिळाला ?

आ. दुसरे म्हणजे या सगळ्या प्रकरणांत देशात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करून अनेकांची दिशाभूल केल्याकारणाने विरोधी पक्ष आणि साम्यवादीधार्जिण्या विद्यार्थी संघटना जनतेची क्षमा मागतील का ?

२. काय आहे रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे प्रकरण  आणि विरोधी पक्षांचा घातक ‘अजेंडा’?

रोहित वेमुलाचे प्रकरण समजून घेण्यासाठी त्याच्या आत्महत्येआधी घडलेल्या घटनांचाही आढावा घेणे आवश्यक आहे. रोहित वेमुला हा हैद्राबाद विद्यापिठात ‘आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन’ या विद्यार्थी संघटनेचा सदस्य होता. ऑगस्ट २०१५ मध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे (‘अभाविप’चे) विद्यापिठातील नेते एन्. सुशील कुमार यांच्यावर झालेल्या आक्रमणात रोहित आणि आणखी ४ जणांची नावे समोर आली होती. यानंतर झालेल्या चौकशीत सप्टेंबर २०१५ मध्ये या पाचही विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. १७ डिसेंबर २०१५ या दिवशी, म्हणजेच रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या महिनाभर आधी या निर्णयाची कार्यवाही करण्यात आली. निलंबनाची पुष्टी केल्यानंतर वेमुलाने १७ जानेवारी २०१६ या दिवशी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर देशात मुद्दाम ‘दलित विरुद्ध इतर’ ही दरी मोठी करण्यासाठी विरोधी पक्षांकडून राळ उडवण्यात आली.

रोहित वेमुलाचा जन्म ३० जानेवारी १९८९ या दिवशी आंध्रप्रदेश राज्यातील गुंटूर जिल्ह्यात मणीकुमार आणि राधिका वेमुला यांच्या पोटी झाला. त्याचे वडील वडार समाजातील आहेत, ज्यांना देशाच्या आरक्षण प्रणालीमध्ये इतर मागास वर्ग (ओबीसी) म्हणून वर्गीकृत केले गेले आहे, तर त्याची आई जन्माने माला समुदायातील आहे, जी अनुसूचित जाती (एस्.सी.) या प्रवर्गात मोडते; परंतु वडार कुटुंबाने दत्तक घेतल्यामुळे तीही आरक्षण प्रणालीमध्ये इतर मागास वर्गात मोडते. जिल्हास्तरीय समितीकडून वेमुला कुटुंबाची सामाजिक चौकशी केल्यानंतर ते अनुसूचित जाती या प्रवर्गाचा भाग नाहीत, हे सत्य समोर आले होते आणि त्यासह विरोधी पक्षांचा घातक ‘अजेंडा’ही (कार्यसूची) देशासमोर आला.

रोहित वेमुला

३. ऑगस्ट २०१५ मध्ये नेमके काय घडले ?

ऑगस्ट २०१५ च्या प्रारंभीला ‘आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन’ने वर्ष १९९३ च्या बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमनला दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर चर्चा करण्यासाठी एक सभा आयोजित केली होती. ‘अभाविप’च्या म्हणण्याप्रमाणे वेमुला आणि ‘आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन’च्या ४ सदस्यांनी मिळून याकूब मेमनसाठी श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. २५७ लोकांचा जीव घेणार्‍या याकूब मेमनला दिलेली फाशी योग्य होती कि अयोग्य ? या अशा प्रश्नांवरूनच भारतीय न्यायव्यवस्थेविषयी असलेली साम्यवादी विद्यार्थ्यांची विश्वासार्हता स्पष्ट होते. वर्ष २०१५ मध्ये ‘अभाविप’ने ‘मुझफ्फरनगर बाकी है’, या मुझफ्फरनगरमधील दंगलीवर आधारित माहितीपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता.

वर्ष २०१४ च्या निवडणुकांच्या आधी झालेल्या या हिंदु-मुसलमान दंगलींना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न या माहितीपटातून केला गेला होता. ‘अभाविप’ने या ‘प्रपोगंडा’ माहितीपटाचे प्रदर्शन देहली विद्यापिठात यशस्वीपणे थांबवले होते. ३ ऑगस्ट २०१५ या दिवशी वेमुला आणि त्याच्या इतर साथीदारांनी ‘आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन’द्वारे ‘अभाविप’विरोधी निदर्शने हैद्राबाद विद्यापिठाच्या कॅम्पसमध्ये केली होती. हैद्राबाद विद्यापिठातील ‘अभाविप’चे अध्यक्ष एन्. सुशील कुमार यांनी ‘फेसबुक’ माध्यमावरील लिखाणामध्ये निदर्शने करणार्‍यांना ‘गुंड’ म्हटले होते. त्यावरून त्या रात्री वेमुला आणि ‘आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन’च्या सदस्यांकडून त्यांना घेराव घालून त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले.

दुसर्‍या दिवशी एन्. सुशील कुमार यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आणि वेमुला, तसेच त्याच्या ४ साथीदारांविरुद्ध पोलीस तक्रार करण्यात आली. ‘अभाविप’कडून या संपूर्ण घटनेवर भाष्य करणारे पत्र सिकंदराबादचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांना पाठवण्यात आले. दत्तात्रेय यांनी ते पत्र पुढे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांना पाठवून दिले अन् हैद्राबाद विद्यापिठात चालू असलेल्या देशविरोधी अन् जातीयवादी कुरापती समोर येऊ लागल्या. या संपूर्ण घटनेची पडताळणी करून हैद्राबाद विद्यापिठाने वेमुलासह आणखी ४ विद्यार्थ्यांना सप्टेंबर २०१५ मध्ये निलंबित केले.

४. रोहित वेमुलाने आत्महत्येपूर्वीच्या पत्रामधील खोडलेली ११ वाक्ये

वेमुलाच्या आत्महत्येनंतर त्याने लिहिलेली ‘सुसाइड नोट’ (आत्महत्येपूर्वीचे पत्र) समोर आली. रोहित वेमुला हा ‘आंबेडकर स्टुडंट असोसिएशन’मध्ये सामील होण्याआधी साम्यवादी विचारसरणीच्या ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एस्.एफ्.आय.)’चा सदस्य होता. त्याच्या ‘सुसाइड नोट’मध्ये ११ वाक्यांचा खोडलेला परिच्छेद आहे. त्यात त्याने असे म्हटले आहे, ‘आंबेडकर स्टुडंट असोसिएशन’, ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ आणि इतर त्यांच्या स्वतःच्या लाभासाठी अस्तित्वात आहेत. क्वचितच एखाद्या व्यक्तीचे आणि या संस्थेचे स्वारस्य जुळते. ‘सत्ता मिळवण्यासाठी, प्रसिद्ध होण्यासाठी किंवा सीमेत राहून महत्त्वाचे बनण्यासाठी आणि आपण व्यवस्था पालटण्याच्या सिद्धतेत आहोत’, असा विचार करण्यासाठी बर्‍याचदा आपण कृतींचा अतिरेकी अंदाज लावतो अन् यांमुळे दुःख प्राप्त करतो; परंतु अद्भुत साहित्य अन् लोकांशी माझी ओळख करून देण्याचे श्रेय मी दोन्ही गटांना दिले पाहिजे.’ पुढे ही ११ वाक्ये रोहित वेमुलाकडून खोडण्यात आली; परंतु यावरून रोहित वेमुलाच्या मनात ‘आंबेडकर स्टुडंट असोसिएशन’मध्ये सामील होण्याआधीची साम्यवादी विचारसरणीच्या ‘एस्.एफ्.आय.’ या दोन्ही संघटनांविषयीची अप्रसन्नता स्पष्ट होते.

५. साम्यवादीधार्जिण्या संघटनांचे उद्दिष्ट

सत्ता प्रस्थापित करण्यासाठी असलेली व्यवस्था उलथून टाकणे आणि त्यासाठी आतंकवादी मार्गांचा स्वीकार करणे म्हणजेच साम्यवादी क्रांती ! मार्क्सपासून आताच्या साम्यवादी नेत्यांपर्यंत हाच या विचारधारेचा गाभा असल्याने स्वप्नरंजित जगात वावरतांना वेमुलासारख्या अनेक कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होणे साहजिक आहे. ज्या देशाच्या राज्यघटनेचा गाभा हा लोकशाहीच्या आधारे पालट घडवून आणण्याचा आहे, त्या देशात रक्तरंजित क्रांतीसाठी ‘बहुजन विरुद्ध इतर’, ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’, ‘भारतीय संस्कृती विरुद्ध साम्यवादी तत्त्व’, ‘भांडवलदार विरुद्ध कामगार’, असे संघर्ष पेटवून प्रस्थापित सामाजिक पद्धतींना संपवून आधुनिकतेच्या नावावर निराधार पद्धत समाजावर लादण्याचे उिद्दष्ट या साम्यवादी संघटना ठेवतात. अनेक विद्यार्थी या प्रचाराला भुलतात आणि शेवटी संघटनात्मक राजकारणामुळे निराशावादी होतात. रोहित वेमुलाच्या ‘सुसाइड नोट’मधील खोडलेल्या ११ ओळी याच साम्यवादी विचारांची ग्वाही देतात.

६. रोहित वेमुलाच्या प्रकरणावरून निर्माण झालेले प्रश्न

असे असले, तरी या सगळ्यात लेखात प्रारंभी लिहिल्याप्रमाणे २ प्रश्न समोर येतात.

अ. एक म्हणजे खोटा जातीचा दाखला रोहित वेमुलाला कुठून मिळाला ?

आ. दुसरे म्हणजे या सगळ्या प्रकरणात देशात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करून अनेकांची दिशाभूल केल्याकारणाने विरोधी पक्ष आणि साम्यवादीधार्जिण्या विद्यार्थी संघटना जनतेची क्षमा मागतील का ?

७. वेमुला याच्या खोट्या जातप्रमाणपत्राविषयी पोलिसांनी सांगितलेली माहिती

वेमुला याच्या जातप्रमाणपत्राविषयी पोलिसांनी दावा केला आहे की, वेमुलाने तो अनुसूचित जातीचा असल्याचा दावा करण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा वापर केला होता. पोलीस अहवालात असे म्हटले आहे, ‘रोहितच्या आईनेच स्वतः त्याच्यासाठी खोटी अनुसूचित जातप्रमाणपत्राची व्यवस्था केली होती, ज्यामुळे वास्तविकता बाहेर आल्यास आपल्या प्रतिष्ठेवर परिणाम होण्याची भीती त्याला वाटत होती. त्यासह त्याची खरी ओळख बाहेर आल्यावर त्याच्या शैक्षणिक पदव्या रहित झाल्या असत्या आणि हे ठाऊक असल्याने वेमुला चिंतित होता.’ पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे वेमुला हा आधीपासूनच विद्यार्थी राजकारणात सक्रीय होता. या आधीही त्याने एकदा ‘पीएच्.डी.’ला प्रवेश घेऊन २ वर्षांत ती सोडली होती आणि दुसर्‍या वेळीही फारशी शैक्षणिक प्रगती करू शकला नव्हता. व्यवस्थेविषयी आणि क्रांती घडवण्याच्या स्वप्नरंजित जगात वावरतांना व्यावहारिकता विसरल्यामुळे वेमुला हताश होता, हे वरील माहितीवरून कळते.

८. रोहित वेमुलाच्या प्रकरणी विरोधी पक्षांनी जनतेची क्षमा मागायला हवी !

दुसर्‍या प्रश्नाविषयी लिहायचे झाले, तर देशात फूट पाडून ‘शोषक विरुद्ध शोषित’ याच चष्म्याने जगाकडे पहाणार्‍या विचारधारेचे वाहक ३ मे २०२४ या दिवशीच्या निर्णयापासून चिडीचूप आहेत. या विचारधारेचे पाईक असणारे इतर प्रवर्गांतील नेते, स्वतःच्या राजकीय लाभासाठी खोटे जातप्रमाणपत्र सादर करत असतील आणि दलितांच्या हक्काच्या संधी हिसकावणार असतील, तर मग मागासवर्गातील विद्यार्थ्यांनी जायचे कुठे ? वेमुलाच्या आत्महत्येनंतर जातीय राजकारण करणार्‍या विरोधी पक्षांनी खरे तर ‘दलित विरुद्ध इतर’, हा खोटा ‘प्रपोगंडा’ केल्याविषयी आणि पडताळणी न करता खोट्या प्रमाणपत्रावर दाखला मिळवून एका होतकरू दलित विद्यार्थ्याची उच्चशिक्षणाची संधी हिरावल्याच्या कारणाने देशातील जनतेची क्षमा मागायला हवी.

या प्रकरणात निरर्थक अडकलेले सिकंदराबादचे तत्कालीन भाजप खासदार बंडारू दत्तात्रेय, भाजप आमदार एन्. रामचंद्र राव, हैद्राबाद विद्यापिठाचे कुलगुरु अप्पाराव यांच्यासह केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री तथा भाजप नेत्या स्मृती इराणी अन् ‘अभाविप’च्या नेत्यांसह आरोपी बनवण्यात आलेल्या सर्वांना न्यायालयाकडून निर्दोष ठरवण्यात आले आहे.

– शांभवी प्रमोद थिटे, नवी देहली

(लेखिका आंतरराष्ट्रीय संबंधांवर नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात ‘पीएच्.डी.’ करत आहेत.)

(साभार : शांभवी प्रमोद थिटे यांचे फेसबुक आणि साप्ताहिक ‘विवेक’ मराठी)