१८ मेपासून श्रीमद् आद्य शंकराचार्य जयंती उत्सवास प्रारंभ ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी

पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देतांना करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी (डावीकडे), शेजारी सचिव श्री. शिवस्वरूप भेंडे

कोल्हापूर, १५ मे (वार्ता.) – श्री स्वामी जगदगुरु शंकराचार्य पीठाच्या वतीने प्रतिवर्षी आद्य शंकराचार्य जयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा उत्सव १८ मे पासून प्रारंभ होत असून या निमित्ताने शुक्रवार पेठ येथील पीठात आठवडाभर प्रवचन, कीर्तन, गायन आणि देवी भागवत यांचे आयोजन केले आहे. त्याचसमवेत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा पीठाच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सचिव श्री. शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते.

शंकराचार्य पुढे म्हणाले, ‘‘आद्य शंकराचार्य यांचा हा २ सहस्र ५३२ वा उत्सव आहे. या उत्सवात २२ मे या दिवशी सकाळी १० वाजता पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. यात पुणे येथील राघव रामदासी यांना वैदिक पुरस्कार, सातारा येथील गोविंदशास्त्री जोशी यांना सांस्कृतिक पुरस्कार, हिंगोली येथील शरद आंबेकर यांना कीर्तनकार पुरस्कार, स्थानिक वैदिक पुरस्कार संदीप काजरेकर यांना, सामाजिक गौरव पुरस्कार संभाजी तथा बंडा साळुंखे यांना, डोंबिवली येथील अस्मिता अरुण देशपांडे यांना महिला कीर्तनकार पुरस्कार, परभणी येथील वाचस्पती कुलकर्णी यांना होतकरू पुरस्कार, तसेच डी.वाय्. पाटील यांना उत्कृष्ट शासकीय कर्मचारी पुरस्कार देण्यात येणार आहे.

हे सर्व कार्यक्रम २३ मेपर्यंत होणार असून त्याच दिवशी पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसाद यांचे आयोजन केले आहे. तरी याचा सर्व भाविक-भक्त यांनी लाभ घ्यावा.’’